Maval BJP : पाठीत खंजीर खुपसणाऱ्यांना आता सोडणार नाही! मावळ भाजपच्या आढावा बैठकीत नेत्यांचा थेट इशारा
Maval BJP : स्थानिक निवडणुकांमध्ये गद्दारी करणाऱ्यांना थेट घरचा रस्ता दाखवा"; सुरेखा जाधव आणि बाळासाहेब जाधव यांची बैठकीत आक्रमक भूमिका.

Maval BJP – भारतीय जनता पक्षाच्या लोणावळा नाणे मावळ मंडळाच्या प्रभारीपदी प्रशांत भागवत यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांनी पदभार स्वीकारताच संपूर्ण नाणे मावळ परिसरात संघटनात्मक दौरे आणि बैठकींचा धडाका सुरू केला आहे. गावपातळीवर कार्यकर्त्यांशी संवाद साधत पक्षाला उभारी देण्यासाठी भागवत यांनी कंबर कसल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
बुधवारी प्रशांत भागवत यांच्या अध्यक्षतेखाली भाजपची आढावा बैठक पार पडली. या बैठकीत अनेक तरुण कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. तसेच कार्यकर्त्यांना एसआयआर संदर्भात सविस्तर माहिती देण्यात आली. आगामी काळात प्रत्येक कार्यकर्त्याने कोणती भूमिका पार पाडायची, याबाबत स्पष्ट सूचना देण्यात आल्या. पक्षासाठी संघटनात्मक काम कसे करायचे, याबाबतही मार्गदर्शन करण्यात आले.
मावळ तालुका भाजपचे एसआयआर प्रमुख गुलाबराव म्हाळसकर यांनी मैदानात सक्रिय होण्याचे आवाहन कार्यकर्त्यांना केले. जिल्हा सरचिटणीस डॉ. कराळे यांनी कार्यकर्त्यांना आश्वस्त करताना प्रामाणिकपणे काम करणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या पाठीशी संघटन पूर्ण ताकदीने उभे राहील, असे सांगितले. मात्र पक्षविरोधी भूमिका घेणाऱ्यांवर कोणतीही गय केली जाणार नसून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला.
यावेळी लोणावळा नाणे मावळ मंडळ अध्यक्ष अनिल गायकवाड यांनी आपल्या गेल्या एक वर्षाच्या कार्यकाळातील कामाचा आढावा पीपीटीच्या माध्यमातून सादर केला. या बैठकीस माजी उपनगराध्यक्ष श्रीधर पुजारी, नगरसेवक दत्तात्रय येवले, रेशमा पाठारे, महिला जिल्हाध्यक्ष सायली बोत्रे, मंडळाच्या महिला अध्यक्षा परिजा भिलारे, युवक अध्यक्ष ज्ञानेश्वर गुंड, माजी नगरसेविका ब्रिनदा गणात्रा, आशा खिल्लारे, ललित सिसोदिया यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी आणि शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.
बैठकीत पक्षांतर्गत नाराजी उफाळली
या बैठकीदरम्यान पक्षांतर्गत नाराजी आणि धुसफूसही उघडपणे समोर आली. माजी नगराध्यक्षा सुरेखा जाधव आणि माजी नगरसेवक बाळासाहेब जाधव यांनी तालुक्यातील पक्षाच्या बोटचेप्या भूमिकेवर तीव्र नाराजी व्यक्त केली. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये पक्षाच्या विरोधात काम करणाऱ्या आणि पक्षाच्या पाठीत खंजीर खुपसणाऱ्यांवर आता कोणतीही गय न करता थेट कठोर कारवाई करावी, अशी आक्रमक मागणी त्यांनी बैठकीत केली.






