“त्या माकडांमुळे आंदोलनाला…” ; CSMT स्थानकावरील हुल्लडबाजांवर जरांगे संतापले, सरकारवर केले गंभीर आरोप

Manoj Jarange got angry। राज्यातील मराठ्यांच्या आरक्षणाच्या मागणीसाठी आज भगवं वादळ मुंबईतील आझाद मैदानावर धडकले आहे. लाखोंच्या जनसमुदायाने आझाद मैदान, मुंबई महापालिका आणि सीएसएमटी स्थानक परिसरात अभूतपूर्व कोंडी झाली आहे. वाहतूक कोंडीशिवाय छत्रपती शिवाजी महाराज स्थानक टर्मिनसमध्ये काही मराठा आंदोलकांनी हुल्लडबाजी केल्याची माहिती समोर आली होती. यावर मनोज जरांगे यांनी संताप व्यक्त केला. काही दोन-चार लोकांमुळे आंदोलनाला गालबोट लागत असल्याचे सांगत स्थानक परिसर सोडण्याचे आवाहन त्यांनी केले.
आज सकाळीच्या सुमारास मराठा आंदोलक आज मोठ्या संख्येने आझाद मैदानावर धडकले. मुंबई पोलिसांनी वाहतुकीच्या नियोजनानुसार आंदोलकांची शेकडो वाहने अडवली आणि निश्चित केलेल्या ठिकाणी पार्किंग करण्याचे आवाहन केले. आंदोलक मोठ्या प्रमाणावर असल्याने आझाद मैदान तुंडुंब भरले. त्यामुळे हजारो जण मुंबई महापालिकेसमोरील रस्त्यावर आले.
सीएसएमटी स्थानकावर हुल्लडबाजी… Manoj Jarange got angry।
मराठा आंदोलकांनी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकाचा ताबा घेतल्याचे दिसून आले. हजारो आंदोलकांनी स्थानकावर ठाण मांडले. त्याशिवाय, काही जणांनी रेल्वे रुळावर उतरत घोषणाबाजी केली. रुळावर उतरलेल्या आंदोलकांना हटवण्यासाठी जीआरपी, आरपीएफची दमछाक झाली. सीएसएमटी स्थानक हे गजबजलेले स्थानक आहे. त्यातच आंदोलकांच्या गर्दीने स्थानकात गोंधळाची स्थिती झाल्याचे दिसून आले. घोषणाबाजीने स्थानक परिसर दणाणून गेला.
मनोज जरांगे संतापले…. Manoj Jarange got angry।
या हुल्लडबाजीची माहिती समजताच, मनोज जरांगे पाटील यांनी संताप व्यक्त केला. CSMT स्थानकात जी मुलं आहेत त्यांनी शांत बसावे. त्यांनी गावाकडे जावं आणि तिथं धिंगाणा करा असे जरांगेंनी संतापून म्हटले. मी आंदोलन सोडून तिथं येईल असा इशारा त्यांनी दिला. CSMT स्थानकात 25-30 माकड आहेत. त्यांच्यामुळे आंदोलन बदनाम होत असल्याचे त्यांनी म्हटले. ही गोंधळ घालणारी मुलं आपली नाहीत, ही मुलं आंदोलनात घुसवली असल्याचाही संशय यावेळी त्यांनी व्यक्त केला. प्रत्येक जिल्ह्यातील एका सदस्याने जाऊन परिस्थिती शांत करावी आणि गोंधळ करणारे कोण आहेत, याची माहिती घेऊन त्यांना योग्य सूचना देण्यास जरांगे यांनी आपल्या कार्यकर्त्यांना सांगितले.





