Gram Panchayat Eleciton Update : मोठी अपडेट! ‘या’ कारणामुळे तब्बल 15 हजार ग्रामपंचायतींच्या निवडणुकांना ब्रेक?
Gram Panchayat Eleciton Update : ग्रामीण राजकारणाला दिशा देणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुकांबाबत मोठी बातमी समोर

Gram Panchayat Eleciton Update : राज्यातील ग्रामीण राजकारणाला दिशा देणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुकांबाबत मोठी बातमी समोर आली आहे. प्रभाग आरक्षणाची प्रक्रिया पूर्ण झाली असली तरी विशेष सखोल मतदारयादी पुनरीक्षण (एसआयआर) प्रक्रियेमुळे तब्बल १५ हजार ६३६ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका पुढे ढकलल्या जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवारांच्या निवडणूक तयारीला अनपेक्षित ब्रेक लागू शकतो.
वर्ष २०२४, २०२५ आणि २०२६ मध्ये मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींच्या निवडणुका यंदा होण्याची अपेक्षा होती. राज्य निवडणूक आयोगाने या ग्रामपंचायतींसाठी प्रभाग रचना आणि आरक्षण सोडतीची प्रक्रिया पूर्ण केली असून १० जुलै रोजी अंतिम आरक्षण प्रसिद्ध होणार आहे. साधारणपणे त्यानंतर प्रभागनिहाय मतदारयाद्या आणि निवडणूक कार्यक्रम जाहीर केला जातो. मात्र, यावेळी सुरू असलेल्या एसआयआर (Special Intensive Revision) प्रक्रियेमुळे संपूर्ण निवडणूक वेळापत्रक बदलण्याची शक्यता आहे.
या प्रक्रियेत मतदारयादीतील मृत, स्थलांतरित तसेच अपात्र मतदारांची नावे वगळली जात आहेत. अंतिम मतदारयादी ७ ऑक्टोबर रोजी प्रसिद्ध होणार आहे. बोगस मतदानाला आळा घालण्यासाठी याच अद्ययावत मतदारयादीच्या आधारे निवडणुका घ्याव्यात, अशी भूमिका अनेक जिल्हाधिकाऱ्यांनी घेतल्याचे सांगितले जात आहे.
हेही वाचा : Besan Recipes: सकाळचा नाश्ता करा हेल्दी आणि चविष्ट! बेसनापासून बनवा ५ झटपट पौष्टिक पदार्थ
अंतिम मतदारयादी प्रसिद्ध झाल्यानंतर प्रभागनिहाय मतदारयाद्या तयार करण्यासाठी आणखी एक ते दीड महिना लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे नोव्हेंबर-डिसेंबरपर्यंत ही प्रक्रिया पूर्ण होईल आणि प्रत्यक्ष निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यास विलंब होऊ शकतो.
यामुळे राज्यातील हजारो ग्रामपंचायतींच्या निवडणुका यावर्षी न होता थेट २०२७ च्या सुरुवातीला होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. असे झाल्यास इच्छुक उमेदवारांचा मोठा अपेक्षाभंग होऊ शकतो. परिणामी ग्रामीण भागातील राजकीय हालचालींना तात्पुरता विराम मिळण्याची चिन्हे दिसत आहेत.





