महायुतीत ‘शीत युद्ध’ ; शिंदे अन् फडणवीसांमध्ये सुप्तसंघर्ष, सत्तास्थापनेपासून ते आजपर्यंत नेमकं काय घडलं? वाचा

Mahayuti cold war। राज्यात विधानसभा निवडणुकीत भूतो ना भविष्यती असा विजय महायुतीने मिळवला. त्यावेळी राज्यातील महायुती सरकार एकसंघपणे पुन्हा एकदा सत्ता स्थापन करणार असल्याचे वाटत होते. मात्र याच वेळी मुख्यमंत्रीपदावरून नाराजीचा पहिला अंक सुरु झाला. माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीच पुन्हा एकदा मुख्यमंत्री व्हावे अशी त्यांच्या नेतेमंडळींनी इच्छा होती तर दुसरीकडे देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्री होण्यासाठी भाजपसह अजित पवारांच्या राष्ट्रवादीने फिल्डिंग लावली होती. त्यानुसार देवेंद्र फडणीवसांच्या गळ्यात मुख्यमंत्रीपदाची माळ पडली आणि इथूनच सुरु झाली महायुतीतील शीतयुद्धाची कहाणी…महायुती सत्तेत आल्यापासून ते आजपर्यंत शिंदे आणि फडणवीस यांच्यात नाराजी असल्याचे म्हटले जात होते.नेमका दोघांमधला वाद काय आहे ? खरंच शिंदे नाराज आहेत का? असतील तर त्या मागची कारणं काय आहेत ? हेच यातून जाणून घेऊ….
राज्यात फडणवीस सरकार स्थापन झाल्यापासून एकनाथ शिंदेंच्या नाराजीची चर्चा मात्र अनेकदा रंगली त्यातच मुख्यमंत्री आणि एक उपमुख्यमंत्री यांच्यातील सुप्तसंघर्ष काही केल्या संपत नसल्याचे दिसत आहे. आधी पालकमंत्रीपदावरुन रुसवे फुगवे, मग महत्वाच्या बैठकांना दांडी. मग एकाच्या वॉर रुमला दुसऱ्याच्या समन्वय कक्षाने उत्तर. हे कमी होतं की काय म्हणून महाराष्ट्रात आता दोन वैद्यकीय कक्ष असणार आहेत. एक मुख्यमंत्री सहाय्यता वैद्यकीय कक्ष आणि दुसरा उपमुख्यमंत्री सहाय्यता वैद्यकीय कक्ष. एक देवेंद्र फडणवीसांचा दुसरा एकनाथ शिंदेंचा.
दरम्यान, महायुतीतील दोन मित्रपक्षात नाराजीचा सूर असल्याच्या बातम्यांचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी खंडण केले आहे. त्यांनी या सर्व बातम्या खोट्या असून असे काही नसल्याचे म्हटले आहे.
मुख्यमंत्री सहाय्यता निधी आणि सीएसआर फंड एकत्र Mahayuti cold war।
एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना या विभागाचे नेतृत्व ते करत होते तर देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री असताना सीएसआर फंडातून रुग्णांना मदत करण्यासाठी वेगळा कक्ष स्थापन केला होता. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानंतर मुख्यमंत्री सहाय्यता निधी आणि सीएसआर फंडातून मदत कक्ष त्यांनी एक केला.
उपमुख्यमंत्र्यांचा स्वतंत्र वैद्यकीय कक्ष Mahayuti cold war।
त्यामुळे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मंत्रालयात स्वतंत्र उपमुख्यमंत्री वैद्यकीय कक्ष सुरू करत आहेत. या कक्षातून आरोग्य विभागाच्या योजनांचा पाठपुरावा केला जाणार आहे. आरोग्य खाते हे शिवसेनेचे प्रकाश आबीटकर यांच्याकडे आहे. या खात्यातील महात्मा फुले जन आरोग्य योजना, चॅरीटी हॉस्पिटल, रुग्णांना मदत करणाऱ्या सेवाभावी संस्था यांच्या सोबत या कक्षातून पाठपुरावा केला जाणार असल्याचे म्हटले जात आहे.
याविषयी बोलताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी, “शिवसेना आणि वैद्यकिय सेवा हे अतूट नातं आहे. रुग्णवाहिका रुग्ण सेवा हा शिवसेनेचा जिव्हाळ्याचा विषय राहिला आहे. राज्य सरकारमध्ये आरोग्य विभाग हा आपल्याकडे आहे. मी मुख्यमंत्री असतानाही अनेक योजना राबवल्या. महात्मा ज्योतिबा फुले ही दीड लाखाची योजना आपण 5 लाख केली. मुख्यमंत्री सहायता निधीच्या माध्यमातून आधीच्या मुख्यमंत्र्यांनी अडीच वर्षात अडीच कोटीचा निधी दिला होता. मात्र तुमच्या या एकनाथ शिंदेने 460 कोटी दिले. त्याचा 1 लाख लोकांना फायदा झाला.” असल्याचे म्हटले.
राष्ट्रवादी-शिवसेनेतही संघर्ष?
हा प्रकार फक्त भाजप आणि शिवसेनेत होतोय असंही नाही. अजित पवार कितीही नाही म्हणत असले तरी शिवसेना आणि राष्ट्रवादीत सुद्धा शीत युद्ध सुरुच आहे. भगूर नगर परिषदेच्या पाणीपुरवठा योजनेचे भूमिपूजन अजित पवार यांनी केलं होतं. मात्र त्याच योजनेचं भूमीपूजन एकनाथ शिंदे पुन्हा करणार असल्याचे सांगण्यात येत आहे.सरकारमधील दोन प्रमुख पक्षांच्या प्रमुखांमध्येच कुरघोडी सुरु असल्याची टीका विरोधकांनी केली आहे.
व्हीआयपी सुरक्षा कपात, शिंदेंचे आमदार नाराज
हे सगळं सुरु असताना सरकारने व्हीआयपी व्यक्तींच्या सुरक्षेचा आढावा घेतला आणि ज्यांच्या जीवाला कोणताही धोका नाही अशा नेत्यांची सुरक्षितता कमी करण्यात आली. यात भाजप, शिवसेना, सोबतच राष्ट्रवादी काँग्रेसमधील नेत्यांची सुरक्षा कमी करण्यात आली. मात्र, सुरक्षा कमी केल्यानं शिवसेना आमदारांनी संताप व्यक्त केल्याची सूत्रांची माहिती आहे.
‘या’ आठ निर्णयाने दोन्ही नेत्यांमध्ये नाराजी
* 18 जानेवारी – शिंदेंच्या आक्षेपानंतर रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्रिपदाच्या नियुक्तीला स्थगिती
* 6 फेब्रुवारी – मुख्यमंत्र्यांकडून एसटी महामंडळाच्या अध्यक्षपदी प्रताप सरनाईकांऐवजी वाहतूक सचिवांची नियुक्ती
* 7 फेब्रुवारी – ठाण्यातल्या समस्या सोडवण्यासाठी पुढाकार घेण्याचा गणेश नाईकांचं वक्तव्य
* 9 फेब्रुवारी – आपत्ती व्यवस्थापन समितीतून शिंदेंना वगळले, चर्चा रंगताच नियम बदलून शिंदेंची नियुक्ती
* 10 फेब्रुवारी – धिकारी न विचारताच धोरणात्मक निर्णय घेत असल्याचा उदय सामंतांचा आरोप
* 14 फेब्रुवारी -‘दाढीवाल्याला हलक्यात घेऊ नका’ असे शिंदेंचे उद्गार, वक्तव्य ठाकरेंना उद्देशून असं भाजपचं स्पष्टीकरण
* 16 फेब्रुवारी – मुख्यमंत्र्याच्या कक्ष असताना शिंदेंकडून उपमुख्यमंत्री ‘वैद्यकीय सहाय्यता कक्षा’ची घोषणा
* 17 फेब्रुवारी – मंत्री नसलेल्या 20 शिवसेना आमदारांची वाय प्लस दर्जाची सुरक्षा काढली





