Maharashtra Rain Alert : विदर्भात पावसाचा धुमाकूळ.! ‘या’ पाच जिल्ह्यांत ऑरेंज अलर्ट
विदर्भातील बहुतांश जिल्ह्यांत पावसाने धुमाकूळ घातल्याचे चित्र आहे. सततच्या पावसामुळे गडचिरोली जिल्ह्याला पुराचा विळखा पडल्याचे चित्र आहे.

Maharashtra Rain Alert : विदर्भातील बहुतांश जिल्ह्यांत पावसाने धुमाकूळ घातल्याचे चित्र आहे. सततच्या पावसामुळे गडचिरोली जिल्ह्याला पुराचा विळखा पडल्याचे चित्र आहे. नदीला आलेल्या पुरामुळे सिरोंचा तालुक्यातील चार गावांचा संपर्क तुटला आहे.
तर आल्लापल्ली शहरातील अनेक घरांमध्ये पाणी शिरले आहे. अमरावतीच्या मेळघाटमध्ये देखील पावसामुळे एकच हाहाकार बघायला मिळतो आहे. सिपना नदीला पूर आल्याने अनेक गावांचा संपर्क तुटल्याची माहिती आहे.
विदर्भात पुढील 24 तासांत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता असून, भारतीय हवामान विभागाने अनेक जिल्ह्यांसाठी सतर्कतेचा इशारा जारी केला आहे. सक्रिय हवामान प्रणालीमुळे पश्चिम विदर्भात पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज आहे.
विदर्भावर सक्रिय झालेल्या हवामान प्रणालीच्या प्रभावामुळे अनेक भागांत मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडू शकतो. पश्चिम विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर अधिक राहण्याची शक्यता असल्याने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
हवामान विभागाने अमरावती आणि यवतमाळ जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट जारी केला आहे. या जिल्ह्यांतील काही भागांत अतिमुसळधार पावसाची शक्यता असून, कमी वेळेत मोठ्या प्रमाणात पाऊस पडण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. जोरदार पावसामुळे नद्या-नाल्यांच्या पाणीपातळीत वाढ होण्याबरोबरच सखल भागांत पाणी साचण्याची शक्यता आहे.
दरम्यान, वाशिम, वर्धा, अकोला, चंद्रपूर आणि नागपूर जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. या जिल्ह्यांमध्ये अनेक ठिकाणी जोरदार ते अतिजोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. काही भागांत विजांच्या कडकडाटासह जोरदार वारे वाहण्याचाही अंदाज असल्याने नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.





