Mahabaleshwar News: ‘नवीन महाबळेश्वर’ चमकवण्यासाठी जुन्याची बदनामी? नगराध्यक्ष सुनील शिंदेंचा गंभीर आरोप
Mahabaleshwar News: मूलभूत सुविधांसाठी निधीची चणचण असताना नवीन महाबळेश्वर प्रकल्पावर कोट्यवधींची उधळपट्टी; जुन्या शहराच्या विकासाकडे दुर्लक्ष का?

Mahabaleshwar News – महाबळेश्वरच्या पर्यटन व्यवसायाला आणि शहराच्या प्रतिमेला जाणीवपूर्वक धक्का देण्याचा कट रचला जात असल्याचा गंभीर आरोप नगराध्यक्ष सुनील शिंदे यांनी केला. सोशल मीडियाचा गैरवापर करून किरकोळ घटनांना अतिरंजित स्वरुप देत संपूर्ण महाबळेश्वरची बदनामी केली जात असल्याचे त्यांनी म्हटले आहे. महाबळेश्वरमध्ये वाहतूक, पार्किंग, टोल किंवा पर्यटकांशी संबंधित समस्या यापूर्वीही होत्या आणि त्या काळातही सोशल मीडिया अस्तित्वात होता.
मात्र, गेल्या एक- दोन वर्षांत महाबळेश्वरविरोधी नकारात्मक प्रचाराचे प्रमाण अचानक का वाढले, याचा शोध घेण्याची गरज असल्याचे नगराध्यक्ष शिंदे यांनी सांगितले. ‘‘जुन्या महाबळेश्वरची प्रतिमा मलिन करून ‘नवीन महाबळेश्वर’ प्रकल्पाला लोकप्रिय करण्याचा प्रयत्न सुरू आहे का?’ असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. महाबळेश्वर आणि क्षेत्र महाबळेश्वर अशा दोन स्वतंत्र ओळखी आधीच अस्तित्वात असताना तिसऱ्या प्रकल्पाला ‘नवीन महाबळेश्वर’ हे नाव देण्यामागील हेतू काय, याबाबतही त्यांनी शंका व्यक्त केली.
महाबळेश्वर शहरातील रस्ते, पार्किंग, पाणीपुरवठा आणि पर्यटन सुविधांसारख्या मूलभूत प्रश्नांसाठी मोठ्या निधीची आवश्यकता असताना कोट्यवधी रुपयांचा निधी नवीन प्रकल्पांकडे वळवला जात असल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली. ‘जुन्या महाबळेश्वरच्या विकासाकडे दुर्लक्ष करून नवीन प्रकल्पांना प्राधान्य का दिले जात आहे?’ असा सवाल त्यांनी शासन आणि संबंधित यंत्रणांना केला.
दरम्यान, काही पर्यटकांशी झालेल्या किरकोळ वादांच्या घटना, टोल नाक्यांवरील तक्रारी किंवा स्थानिक प्रश्नांचे व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल करून ‘बॉयकॉट महाबळेश्वर’सारखे ट्रेंड निर्माण केले जात असल्याचा आरोपही त्यांनी केला. काही व्यक्ती किंवा गट योजनाबद्ध पद्धतीने शहराची प्रतिमा खराब करण्यासाठी नकारात्मक वातावरण निर्माण करत असल्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली.
महाबळेश्वरकर, व्यापारी, हॉटेल व्यावसायिक आणि पर्यटन क्षेत्राशी संबंधित सर्व घटकांना एकत्र येण्याचे आवाहन नगराध्यक्ष सुनील शिंदे यांनी केले. ‘महाबळेश्वर हे केवळ पर्यटनस्थळ नाही, तर हजारो कुटुंबांच्या उदरनिर्वाहाचे साधन आहे. शहराची बदनामी करणाऱ्या कोणत्याही कटाविरोधात एकजुटीने उभे राहणे ही काळाची गरज आहे,’ असे त्यांनी स्पष्ट केले.






