Om Birla: लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांना पदावरून हटवण्यासाठी विरोधकांनी आणलेला अविश्वास ठराव बुधवारी सभागृहात आवाजी मतदानाने फेटाळण्यात आला. गृहमंत्री अमित शाह यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्याबद्दल केलेल्या विधानावरून काँग्रेस सदस्यांनी सभागृहात प्रचंड गदारोळ केला, अशा गोंधळातच हा ठराव नामंजूर करण्यात आला. काँग्रेस खासदार मोहम्मद जावेद यांनी हा ठराव मांडला होता, ज्यावर दोन दिवस जोरदार चर्चा झाली. या चर्चेदरम्यान सत्ताधारी आणि विरोधी पक्षांनी एकमेकांवर तिखट शब्दांत प्रहार केले. चर्चेला उत्तर देताना गृहमंत्री अमित शाह यांनी विरोधकांवर कडाडून टीका केली. त्यांनी म्हटले की, “सुमारे चार दशकांनंतर लोकसभा अध्यक्षांविरुद्ध अविश्वास ठराव आणला जाणे, हे संसदीय राजकारण आणि या सभागृहासाठी अत्यंत दुर्दैवी आहे.” हेही वाचा – भारताकडे निघालेल्या जहाजावर क्षेपणास्त्र हल्ला! 3 खलाशी बेपत्ता, इराणने घेतली जबाबदारी शाह पुढे म्हणाले की, “हे सभागृह म्हणजे काही बाजारपेठ नाही. सदस्यांनी नियमांचे आणि प्रक्रियेचे पालन करणे अपेक्षित आहे. अध्यक्ष हे सत्ताधारी आणि विरोधी पक्ष दोघांचेही प्रतिनिधित्व करणारे निष्पक्ष रक्षक असतात. तुम्ही थेट या मध्यस्थावरच संशय व्यक्त करून भारताच्या लोकशाहीच्या प्रतिष्ठेला धक्का लावला आहे.” विशेष म्हणजे, भाजपने अनेक वर्षे विरोधी पक्षात असूनही कधीही लोकसभा अध्यक्षांविरुद्ध असा ठराव आणला नाही, याची आठवणही त्यांनी करून दिली. ठरावावरील चर्चेत एकूण ४२ सदस्यांनी सहभाग घेतला. चर्चेच्या शेवटी, पीठासीन अधिकारी जगदंबिका पाल यांनी काँग्रेस खासदारांना त्यांच्या जागेवर जाऊन बोलण्याचे आवाहन केले, परंतु गदारोळ न थांबल्याने त्यांनी आवाजी मतदान घेतले. बहुमताने हा ठराव फेटाळला गेल्याचे पाल यांनी जाहीर केले. अविश्वास ठरावाची कारणे – अविश्वास ठरावामागे विरोधी पक्षांचा सर्वांत मोठा आरोप हा होता की जेव्हा विरोधी पक्षनेते राहुल गांधी सभागृहात महत्त्वाचे मुद्दे मांडतात, तेव्हा जाणीवपूर्वक त्यांचा माइक बंद केला जातो आणि त्यांना बोलण्यासाठी पुरेसा वेळ दिला जात नाही. काँग्रेसचे गौरव गोगोई आणि इतर विरोधी खासदारांनी स्पीकर बिरला यांच्यावर पक्षपातीपणाचा आरोप केला. त्यांचे म्हणणे होते की सभागृहात विरोधी पक्षांचा आवाज दाबला जात आहे आणि स्पीकर सत्ताधारी पक्षाच्या बाजूने वागत आहेत.