Pune District : शिक्षकांना शिकवू द्या; अशैक्षणिक कामांतून मुक्त करा – लक्ष्मणराव हरणावळ
Pune District : ‘शिक्षक हा शिक्षण व्यवस्थेचा केंद्रबिंदू आहे. त्याच्या हातात पुस्तक आणि विद्यार्थ्यांचे भविष्य असायला हवे; विविध अशैक्षणिक जबाबदार्यांचे ओझे नव्हे,’ अशी भूमिका त्यांनी मांडली. मुख्याध्यापक व शिक्षकांना वैयक्तिक नावाने एफएसएसएआय अथवा एफबीओ नोंदणी करण्याची सक्ती थांबवावी, या मागणीसाठी शिक्षक संघाने सुरू केलेल्या मोहिमेला हरणावळ यांनी पाठिंबा दिला.

इंदापूर : शिक्षकांचे प्रमुख कर्तव्य विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देणे हेच आहे. मात्र, विविध अशैक्षणिक कामांच्या वाढत्या जबाबदार्यांमुळे शिक्षकांचा अध्यापनासाठीचा वेळ कमी होत असून, त्याचा थेट परिणाम विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेवर होण्याची शक्यता आहे. त्यातच प्रधानमंत्री पोषणशक्ती निर्माण योजनेअंतर्गत ‘एफएसएसएआय’ नोंदणीची वैयक्तिक जबाबदारी शिक्षकांवर टाकण्याची सक्ती थांबवावी, अशी ठाम भूमिका गुरुकुल विद्या मंदिर, गोखळीचे संस्थापक व पुणे पदवीधर संघाचे मुख्य नेते लक्ष्मणराव हरणावळ यांनी व्यक्त केली.
महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाने सुरू केलेल्या ‘नो एफएसएसएआय’ मोहिमेला पाठिंबा देत, शिक्षकांच्या या लढ्याला यश मिळेपर्यंत ठामपणे साथ देणार, असा निर्धारही हरणावळ यांनी व्यक्त केला. प्रधानमंत्री पोषणशक्ती निर्माण योजनेचा उद्देश विद्यार्थ्यांना सुरक्षित, पौष्टिक व दर्जेदार आहार उपलब्ध करून देणे हा आहे. या उद्देशाला शिक्षकांचा पूर्ण पाठिंबा आहे. मात्र, अन्नसाहित्याचा पुरवठा, भोजन तयार करण्याची प्रक्रिया आणि अन्नव्यवस्थापनासाठी स्वतंत्र यंत्रणा असताना त्याची वैधानिक जबाबदारी मुख्याध्यापक व शिक्षकांच्या वैयक्तिक नावावर टाकणे योग्य नाही, असे हरणावळ यांनी स्पष्ट केले.
‘शिक्षक हा शिक्षण व्यवस्थेचा केंद्रबिंदू आहे. त्याच्या हातात पुस्तक आणि विद्यार्थ्यांचे भविष्य असायला हवे; विविध अशैक्षणिक जबाबदार्यांचे ओझे नव्हे,’ अशी भूमिका त्यांनी मांडली. मुख्याध्यापक व शिक्षकांना वैयक्तिक नावाने एफएसएसएआय अथवा एफबीओ नोंदणी करण्याची सक्ती थांबवावी, या मागणीसाठी शिक्षक संघाने सुरू केलेल्या मोहिमेला हरणावळ यांनी पाठिंबा दिला. अन्नसुरक्षेशी संबंधित वैधानिक जबाबदारी कोणत्या संस्था अथवा यंत्रणेची आहे, याबाबत शासनाने स्पष्ट आणि एकसमान आदेश काढावा. शिक्षकांवरील वैयक्तिक वैधानिक जोखीम दूर करावी, अशी मागणी त्यांनी केली.
एफएसएसएआयच्या नियमांनुसार अन्नसुरक्षेशी संबंधित जबाबदारी नेमकी कोणत्या संस्था अथवा यंत्रणेची आहे, याबाबत शासनाने स्पष्ट धोरण जाहीर करावे. तोपर्यंत नोंदणी न केल्याच्या कारणावरून कोणत्याही शिक्षकावर कारणे दाखवा नोटीस, सक्ती अथवा शिस्तभंगाची कारवाई करू नये, अशी मागणीही त्यांनी केली.
अध्यापनाचा वेळ कमी होण्याची चिंता
शिक्षकांना जनगणना, निवडणूक, आपत्ती व्यवस्थापन यांसारख्या विविध शासकीय कामांसाठी वेळोवेळी नियुक्त केले जाते. त्यात आता पोषण आहार व्यवस्थापनाशी संबंधित अतिरिक्त जबाबदार्या वाढत असल्याने शिक्षकांचा अध्यापनासाठीचा वेळ कमी होत आहे. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेवर त्याचा परिणाम होऊ शकतो. त्यामुळे शिक्षकांना अधिकाधिक वेळ अध्यापनासाठी मिळणे ही शिक्षण व्यवस्थेची प्राथमिक गरज आहे, असे हरणावळ यांनी नमूद केले.
विद्यार्थ्यांच्या हितासाठी शिक्षकांना शिकविण्याचे स्वातंत्र्य आणि पुरेसा वेळ मिळालाच पाहिजे. शिक्षकांच्या प्रश्नावर केवळ घोषणा नको, तर शासनाने ठोस निर्णय घ्यावा. एफएसएसएआयच्या प्रश्नावर शिक्षक संघाने सुरू केलेल्या लढ्याला न्याय मिळेपर्यंत आपण त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहू.
-लक्ष्मणराव हरणावळ, मुख्य नेते, पुणे पदवीधर संघ





