नवी दिल्ली – भारतीय नौदलासाठी बांधण्यात येत असलेल्या ‘अर्नाळा’ या जहाजाचे आज कट्टुपल्ली, चेन्नई येथे जलावतरण करण्यात आले. संरक्षण मंत्रालयाच्या आर्थिक सल्लागार (संरक्षण सेवा) रसिका चौबे यांच्या उपस्थितीत बंगालच्या उपसागरात जलावतरण करण्यात आले.
नौदलाच्या सागरी परंपरेला अनुसरून रसिका चौबे यांनी अथर्ववेदाच्या मंत्रोच्चारात जहाजाचे जलावतरण केले. महान मराठा योद्धे , छत्रपती शिवाजी महाराज यांनी महाराष्ट्रातील वसईपासून सुमारे 13 किमी उत्तरेस स्थित अर्नाळा बेटाला दिलेले सामरिक सागरी महत्त्व सूचित करण्यासाठी जहाजाला अर्नाळा नाव देण्यात आले आहे.
आठ जहाजांची निर्मिती करण्यासाठी 2019 मध्ये संरक्षण मंत्रालय आणि गार्डन रीच शिपबिल्डर्स अँड इंजिनीअर्स यांच्यात करार करण्यात आला होता. अर्नाळा श्रेणीची जहाजे किनाऱ्यालगत पाण्यामध्ये आणि कमी तीव्रतेच्या सागरी मोहिमांमध्ये पृष्ठभागावर देखरेख करतील.
पाणबुडीविरोधी कारवाईच्या उद्देशाने याची रचना केली आहे. 77.6 मीटर लांब असलेल्या या जहाजाचा कमाल वेग 25 सागरी मैल आणि कठीण परिस्थितीत तग धरण्याची क्षमता 1800 सागरी मैल आहे.