Kangana Ranaut – राजीव गांधी बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅडव्होकेट रमाशंकर शर्मा यांनी बुधवारी सांगितले की, शेतकरी आणि स्वातंत्र्यसैनिकांविरोधात केलेल्या कथित आक्षेपार्ह वक्तव्यांवरून भाजप खासदार व अभिनेत्री कंगना राणावत विरोधात दाखल केलेल्या त्यांच्या याचिकेवर पुन्हा सुनावणी सुरू झाली आहे. पुनर्विचार याचिका दाखल केल्यानंतर न्यायालयाने हे प्रकरण पुन्हा उघडले असून आता अभिनेत्रीवर देशद्रोहाचा खटला चालविण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे. काय आहे संपूर्ण प्रकरण? माध्यमांशी अॅड. शर्मा यांनी सांगितले की, त्यांनी ११ सप्टेंबर २०२४ रोजी आग्रा येथील स्थानिक न्यायालयात याचिका दाखल केली होती. या याचिकेत त्यांनी आरोप केला की, कंगना राणावतने सोशल मीडियावर एक असा पोस्ट शेअर केला होता, ज्यात शेतकरी समुदायाचा अपमान करण्यात आला होता आणि महात्मा गांधी तसेच स्वातंत्र्यसैनिकांविरोधात देशद्रोही भाष्य करण्यात आले होते. शर्मा यांच्या म्हणण्यानुसार, न्यायालयाकडून अनेक वेळा नोटिसा पाठवूनही ना कंगना राणावतने, ना त्यांच्या वकिलांनी कोणताही प्रतिसाद दिला. त्यांनी सांगितले, “न्यायालयाने त्यांना आपली बाजू मांडण्यासाठी शेवटची संधी दिली होती, पण त्यांच्या कडून कोणतीही प्रतिक्रिया आली नाही.” कंगनाच्या बाजूने काही प्रतिसाद नाही : यानंतर ९ जानेवारी २०२५ रोजी न्यायालयाने पोलिसांना निर्देश दिले की, याचिकाकर्त्याने सादर केलेल्या तक्रारी व पुराव्यांच्या आधारे एक सविस्तर अहवाल सादर करावा. अॅड. शर्मा यांनी सर्व आवश्यक कागदपत्रे, सोशल मीडिया पोस्ट आणि पुरावे न्यायालयात जमा केले होते. मात्र, अभिनेत्रीच्या बाजूने कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने आणि प्रक्रियात्मक विलंबामुळे ही याचिका नंतर न्यायालयाने निकाली काढली होती. अॅड. शर्मा म्हणाले, “कंगना राणावतच्या बाजूने कोणताही उत्तर किंवा कायदेशीर मुद्दा सादर करण्यात आला नाही. त्यामुळे न्यायालयाने हा खटला बंद केला होता. मात्र मी यावर पुनर्विचार याचिका दाखल केली, जी आता न्यायालयाने मान्य केली असून सुनावणी पुन्हा सुरू झाली आहे.” पुन्हा सुरू होणार सुनावणी : शर्मा यांनी सांगितले की, त्यांच्या याचिकेचा उद्देश प्रकरण पुन्हा उघडणे आणि आरोपांची सखोल न्यायिक चौकशी सुनिश्चित करणे हा आहे. ते म्हणाले, “न्यायालयाने ही याचिका नव्याने सुनावणीसाठी सूचीबद्ध केली आहे. मला खात्री आहे की यामध्ये न्याय नक्की मिळेल.” कंगना राणावतच्या सोशल मीडिया पोस्ट्स आणि राजकीय विधानांमुळे यापूर्वीही अनेक वेळा वाद निर्माण झाले आहेत. त्यांच्या वक्तव्यांमुळे कायदेशीर विवाद आणि जनमताची तीव्र प्रतिक्रिया उमटत आली आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी येत्या काही आठवड्यांत होणार आहे.