Kaas Pathar: अखेर आतुरता संपली! कास पठारावर आजपासून फुलोत्सव सुरू; पण जाण्यापूर्वी ‘हा’ नियम नक्की वाचा
Kaas Pathar: नाजूक जैवविविधता जपण्याचे वन विभागाचे आवाहन. रानफुलांचा बहर पाहण्यासाठी सोयी-सुविधा सज्ज; पर्यटकांना नियमांचे काटेकोर पालन करण्याचे निर्देश.

Kaas Pathar – निसर्गप्रेमी आणि पर्यटकांची आतुरता संपली असून जगप्रसिद्ध कास पठारावरील फुलांचा बहर पाहण्याचा हंगाम आजपासून (दि. १) सुरु होत आहे. रंगीबेरंगी रानफुलांनी सजणाऱ्या कासच्या पठाराबरोबरच यंदा मंडपघळ, कुमुदिनी तलाव, कास तलाव आणि परिसरातील विविध निसर्गस्थळे पर्यटकांसाठी आकर्षण ठरणार आहेत. कास पठारावर पर्यटनासाठी येणाऱ्या पर्यटकांची गर्दी लक्षात घेता शनिवार,
रविवार तसेच शासकीय सुट्टीच्या दिवशी केवळ ऑनलाइन बुकिंग केलेल्या पर्यटकांनाच प्रवेश दिला जाणार आहे. शनिवार रविवार किंवा सुटीच्या दिवशी थेट येणाऱ्या पर्यटकांना प्रवेश मिळणार नसल्याचे वन विभाग आणि कास पठार सहा गाव संवर्धन समितीने स्पष्ट केले आहे. एका दिवसासाठी पर्यटकांची ऑनलाइन प्रवेशाची मर्यादा तीन हजार ठेवण्यात आली आहे. सध्या पठारावर चवर या फुलांचा बहर दिसून येत असून अन्य रानफुलेही तुरळक स्वरूपात उमलली आहेत.
पर्यटकांकडून प्रतिव्यक्ती २०० रुपये प्रवेश शुल्क आकारले जाणार आहे. या शुल्कामध्ये पार्किंगपासून पठारापर्यंत मोफत बससेवा, प्रत्येक ग्रुपला माहितीपत्रिका तसेच एकीव व कास तलाव निरीक्षण मनोऱ्यावरून दुर्बिणीद्वारे परिसराचे दर्शन या सुविधांचा समावेश आहे. कुमुदिनी तलाव परिसर पाहण्यासाठी राजमार्ग ते कुमुदिनी तलाव इलेक्ट्रिक बसची सुविधा उपलब्ध करण्यात आली असून त्यासाठी ये- जा मिळून प्रतिव्यक्ती १०० रुपये शुल्क आकारले जाणार आहे.
शालेय सहलींसाठी विद्यार्थ्यांना प्रतिव्यक्ती ४० रुपये शुल्क असून त्यासाठी संबंधित प्राचार्यांचे पत्र आवश्यक आहे. बारा वर्षांवरील पर्यटकांसाठी २०० रुपये शुल्क राहणार आहे. दहा जणांच्या ग्रुपसाठी गाइडची सेवा प्रतितास २०० रुपये शुल्कात उपलब्ध होणार आहे. यंदा पर्यटकांच्या सुविधेसाठी हिरकणी कक्ष, पॅगोडा, विश्रांती कक्ष, आकर्षक स्वागत कमानी, नैसर्गिक दगडी कमान, स्वच्छतागृहे आणि पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.
मंडपघळ येथील दऱ्याखोऱ्यांचे विहंगम दृश्य आणि नैसर्गिक सौंदर्य पर्यटकांना विशेष आकर्षित करण्याची शक्यता आहे. कासचा फुलांचा हंगाम सुरू होत असताना पर्यटकांनी ऑनलाइन बुकिंग, प्रवेशाच्या नियमांसह माहितीपत्रिकेतील सूचनांचे काटेकोर पालन करावे आणि कासच्या नाजूक जैवविविधतेचे संवर्धन करण्यासाठी फुलांना हात न लावता निसर्गाचा आनंद घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.






