Political News : माजी मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांना मोठा राजकीय धक्का बसला असून त्यांची मुलगी आणि माजी खासदार के. कविता यांनी नव्या राजकीय पक्षाची घोषणा केली आहे. ‘तेलंगणा राष्ट्र समिती’ असे नव्या पक्षाचे नाव जाहीर करत त्यांनी राज्याच्या राजकारणात नव्या समीकरणांची सुरुवात केली आहे. (Political News) विशेष म्हणजे, याच नावाने पूर्वी के. चंद्रशेखर राव यांनी तेलंगणा राज्याच्या स्थापनेसाठी आंदोलनाची मुहूर्तमेढ रोवली होती. त्यामुळे कवितांच्या या निर्णयाला प्रतीकात्मक महत्त्वही प्राप्त झाले आहे. काही महिन्यांपूर्वी बीआरएस पक्षातून के. कविता यांची हकालपट्टी करण्यात आली होती. पक्षविरोधी कारवाया आणि भूमिका घेतल्याचा आरोप ठेवत त्यांच्यावर कारवाई झाली होती. त्यानंतर त्यांनी स्वतंत्र पक्ष स्थापन करण्याचे संकेत दिले होते, ज्यावर आता अधिकृत शिक्कामोर्तब झाले आहे. (Political News) नव्या पक्षाच्या घोषणेनंतर बोलताना कविता म्हणाल्या, “तेलंगणा राज्य स्थापन होऊन १२ वर्षांहून अधिक काळ झाला, मात्र लोकांच्या अपेक्षा अजूनही अपूर्ण आहेत. पाणी, रोजगार आणि आर्थिक समस्या आजही तशाच आहेत.” त्यांनी मागील सरकारवर टीका करत म्हटले की, “शेतकरी, तरुण, उद्योजक आणि मागासवर्गीयांच्या अपेक्षा पूर्ण करण्यात अपयश आले आहे. आमचा पक्ष सर्वसमावेशक विकास आणि आत्मनिर्भरतेसाठी काम करेल.” (Political News) कवितांनी बीआरएस आणि भाजपवरही जोरदार हल्लाबोल करत, “तेलंगणात विरोधी पक्ष म्हणून दोन्ही पक्ष अपयशी ठरले आहेत. राज्य निर्मितीसाठी लढणाऱ्यांचा सन्मानही होत नाही,” असा आरोप केला. दरम्यान, ऐन निवडणूकपूर्व काळात नव्या पक्षाच्या घोषणेमुळे तेलंगणाच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली असून पुढील राजकीय घडामोडींवर सर्वांचे लक्ष लागले आहे. (Political News)