Jamkhed News – महाराष्ट्र शासनाच्या कडधान्य आत्मनिर्भर कृषी अभियान अंतर्गत हमी भाव योजनेंतर्गत २०२५-२६ या हंगामासाठी NCCF व महाराष्ट्र राज्य कृषि पणन मंडळ यांचे संयुक्त विद्यमाने कृषी उत्पन्न बाजार समिती जामखेडच्या मुख्य बाजार आवारात हरभरा व तूर या पिकांसाठी शासकीय हमीभाव नोंदणी व खरेदी केंद्र सुरू केले आहे. शेतकऱ्यांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन सभापती पै. शरद कार्ले, उपसभापती नंदकुमार गोरे व संचालकांनी केले आहे. या हमीभाव केंद्रात हरभरा ५८७५ रुपये प्रती क्विंटल तर तूर ८००० रुपये प्रती क्विंटल या भावाने खरेदी केली जाणार आहे. यामुळे शेतकऱ्यांना खासगी व्यापाऱ्यांपेक्षा नक्कीच जास्त रक्कम मिळून त्यांचा आर्थिक फायदा होणार आहे. या संधीचा फायदा घ्यावा, असे आवाहन बाजार समितीचे सभापती शरद कार्ले, उपसभापती नंदकुमार गोरे यांनी केले आहे. बाजार समितीच्या वतीने सुरू करण्यात आलेले हे हमीभाव केंद्र बाजार समितीतच असून, हरभरा व तुर उत्पादक शेतकऱ्यांनी या ठिकाणी येऊन आपल्याकडे विक्रीसाठी उपलब्ध असलेल्या हरभरा व तूर पिकांची रितसर नोंदणी करावी. यासाठी येताना सन २०२५-२६ ऑनलाईन पिक पेरा असलेला ७/१२ उतारा, आधारकार्ड झेरॉक्स व IFSC कोड सहित आधारलिंक असलेले बँक पासबुक ही कागदपत्रे आणणे आवश्यक आहे. नियमानुसार नोंदणी व खरेदी वेळ ही सकाळी ११ ते सायंकाळी ५ पर्यंत असून शासनाने ठरवून दिलेल्या निकषानुसार एफएक्यू दर्जाचा माल खरेदी करण्यात येणार असल्याची माहिती बाजार समितीच्यावतीने देण्यात आली.