IPL 2024 : कोलकाता नाईट रायडर्स (KKR) आणि राजस्थान रॉयल्स यांच्यातील 17 एप्रिल रोजी कोलकाता येथील ईडन गार्डन्सवर होणाऱ्या सामन्याचे वेळापत्रक बदलण्यात आले आहे. आता या दोन संघांमधील हा सामना एक दिवस आधी म्हणजेच 16 एप्रिल रोजी होणार आहे.
यापूर्वी या दिवशी (16 एप्रिल) गुजरात टायटन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात सामना होणार होता, मात्र केकेआर आणि राजस्थान यांच्यातील सामन्यात बदल झाल्यामुळे आता गुजरात आणि दिल्ली यांच्यातील सामना 17 एप्रिल रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार आहे.
रामनवमीच्या पार्श्वभूमीवर या आयपीएल सामन्यांच्या वेळापत्रकात बदल ( KKR-RR, GT-DC games rescheduled ) करण्यात आला आहे. हा वार्षिक उत्सव देशभरातील सनातन धर्माचे पालन करणारे लोक मोठ्या थाटामाटात साजरा करतात. त्याचबरोबर पश्चिम बंगालमध्ये 19 एप्रिलपासून लोकसभा निवडणुकीला सुरुवात होणार आहे. या पार्श्वभूमीवर कोलकाता पोलिसांनी या सामन्यासाठी सुरक्षा पुरवण्यास असमर्थता दर्शवली होती.
🚨 NEWS 🚨
KKR-RR, GT-DC games rescheduled.
Details 🔽 #TATAIPL https://t.co/O56PJaKKv4
— IndianPremierLeague (@IPL) April 2, 2024
केकेआर आणि राजस्थान यांच्यातील सामन्यात बदलाबाबत सातत्याने अटकळ होती. कोलकाता पोलिस, भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) आणि क्रिकेट असोसिएशन ऑफ बंगाल (सीएबी) यांच्यात चर्चा सुरू असल्याचे वृत्त होते, परंतु अखेरीस सामन्याची तारीख बदलण्याचा निर्णय घेण्यात आला.
पीटीआय या वृत्तसंस्थेनुसार, कोलकाता पोलिसांनी बंगाल क्रिकेट संघाचे (सीएबी) अध्यक्ष स्नेहशिष गांगुली यांना पाठवलेल्या पत्रात लिहिले आहे की, हा सामना रामनवमीच्या दिवशी होत आहे आणि निवडणुकांमुळे तेथे काही सुरक्षा कर्मचारी तैनात केले जातील, त्यामुळे 17 एप्रिल रोजी होणाऱ्या सामन्यासाठी आम्ही पुरेशी सुरक्षा पुरवू शकत नाही.
तिकिटांचे काय होणार…
केकेआर-राजस्थान आणि गुजरात-दिल्ली यांच्यातील सामन्यांच्या तारखेत बदल जाहीर झाला असला तरी, या सामन्यांच्या आधीच विकल्या गेलेल्या तिकिटांचे काय होणार हे अद्याप आयपीएलने स्पष्ट केलेले नाही.
आयपीएलचे वेळापत्रक दोन टप्प्यात निश्चित…
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बीसीसीआयने आयपीएलच्या 17 व्या हंगामाचे वेळापत्रक दोन टप्प्यात निश्चित केले होते. सुरुवातीला मंडळाने या स्पर्धेतील 21 सामन्यांचे वेळापत्रक जाहीर केले आणि लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्यानंतर उर्वरित 53 सामन्यांचे वेळापत्रक जाहीर केले.
वेळापत्रक तयार करताना बीसीसीआयने होम अवे फॉरमॅटला कोणत्याही परिस्थितीत कोणतीही अडचण येऊ नये याची पूर्ण काळजी घेतली. देशात 19 एप्रिलपासून सात टप्प्यात लोकसभा निवडणुका होणार असून शेवटच्या टप्प्यातील मतदान 1 जून रोजी होणार आहे, तर 4 जून रोजी निकाल जाहीर होणार आहेत.