T20 World Cup 2024 : आयपीएलनंतर लगेचच टी-20 वर्ल्ड कपमध्ये खेळणं ‘Team India’ ला पडलंय महागात..! जाणून घ्या, काय सांगते आकडेवारी….

T20 World Cup & IPL : आजपासून टी-20 विश्वचषक 2024 स्पर्धेचा महासंग्राम सुरू होत आहे. टी-20 विश्वचषक स्पर्धेची ही नववी आवृत्ती असून सर्व संघ त्यासाठी सज्ज झाले आहेत. हा सर्वात मोठा टी-20 विश्वचषक असेल, कारण त्यात 20 संघ सहभागी होत आहेत.
भारताला ‘अ’ गटात आयर्लंड, पाकिस्तान, अमेरिका आणि कॅनडासह स्थान देण्यात आले आहे. सर्वांच्या नजरा टीम इंडियावर आहेत कारण रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली हा संघ 11 वर्षांचा आयसीसी (ICC) ट्रॉफीचा दुष्काळ संपवण्याचा प्रयत्न करणार आहे. मात्र, हा प्रवास भारतीय संघासाठी सोपा असणार नाही. सर्वात मोठी गोष्ट म्हणजे टीम इंडियाने आयपीएलनंतर लगेचच या स्पर्धेत प्रवेश केला आहे आणि याआधी जेव्हाही असे घडले आहे तेव्हा भारताची कामगिरी खूपच खराब झाली आहे.
आयपीएलनंतर लगेचच टी-20 वर्ल्ड कपमध्ये भारताची कामगिरी…
भारतीय संघ आयपीएलनंतर लगेचच तीन वेळा टी-20 विश्वचषक खेळला आहे आणि तिन्ही वेळा संघ उपांत्य फेरी किंवा बाद फेरीपर्यंत पोहोचू शकला नाही.
T20 World Cup 2009 : साल 2009 मध्ये, भारत आयपीएलनंतर 12 दिवसांनी टी-20 विश्वचषक खेळला आणि सुपर आठ फेरीतच बाहेर पडला.
T20 World Cup 2010 : त्याच वेळी, 2010 मध्ये, संघ आयपीएल संपल्यानंतर पाच दिवसांनी टी -20 विश्वचषकात पोहोचला आणि त्यावेळी सुध्दा सुपर 8 फेरीत पराभूत होऊन बाहेर पडला होता.
T20 World Cup 2021 : साल 2021 मध्ये, भारतीय संघ आयपीएल संपल्यानंतर आठ दिवसांनी टी -20 विश्वचषक खेळण्यासाठी आला होता आणि गट टप्पा देखील पार करू शकला नाही. त्यावेळी भारताला पाकिस्तान आणि न्यूझीलंडसारख्या संघांविरूध्द पराभवाला सामोरे जावे लागले होते.
तेव्हापासून एकदाही टी-20 वर्ल्ड कप जिंकता आलेला नाही…
आयपीएलची सुरुवात 2008 मध्ये झाली आणि तेव्हापासून टीम इंडियाला एकदाही टी-20 वर्ल्ड कप जिंकता आलेला नाही. आयसीसीच्या कोणत्याही स्पर्धेत भारताची कामगिरी संमिश्र राहिली आहे. टीम इंडियाने 2008 पासून आतापर्यंत 16 आयसीसी स्पर्धा खेळल्या आहेत आणि सात वेळा फायनल गाठली आहे. यात संघाला केवळ दोनदाच विजेतेपद पटकावता आले. याशिवाय चार वेळा भारतीय संघ उपांत्य फेरीतून, तर पाच वेळा सुपर-8 किंवा साखळी फेरीतून बाहेर पडला आहे. भारताने जिंकलेल्या दोन ट्रॉफी एकदिवसीय सामन्यातील आहेत.
साल 2011 मध्ये टीम इंडियाने घरच्या मैदानावर एकदिवसीय विश्वचषक जिंकला होता, तर 2013 मध्ये भारतीय संघाने इंग्लंडमध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली होती. ज्या पाच फायनलमध्ये भारत हरला त्यात 2014 टी-20 वर्ल्ड कप फायनल (श्रीलंकेकडून पराभूत), 2017 चॅम्पियन्स ट्रॉफी फायनल (पाकिस्तानकडून पराभूत), 2021 वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनल (न्यूझीलंडकडून पराभूत), 2023 वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनल (ऑस्ट्रेलियाकडून पराभव) आणि 2023 एकदिवसीय विश्वचषक फायनल (ऑस्ट्रेलियाकडून हरले). यांचा समावेश आहे.





