Table Tennis : अर्चना कामथने 24 व्या वर्षीच घेतली निवृत्ती, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारतासाठी रचला होता इतिहास….

Archana Kamath Quits Table Tennis :- पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये भारताचे टेबलटेनिसमध्ये प्रतिनिधीत्व करणारी टेबलटेनिसपटू अर्चना कामथने संन्यास घेत असल्याची घोषणा केली आहे. भारतीय महिला टेबल टेनिस संघाने पॅरिस ऑलिम्पिकमध्ये उपांत्यपूर्व फेरी गाठून इतिहास रचला होता ज्यामध्ये अर्चना देखील संघाचा एक भाग होती. जर्मनीविरुद्धच्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात भारतीय संघाला 1-3 ने पराभवाला सामोरे जावे लागले होते, त्या सामन्यात भारताने केवळ एकच सामना जिंकला होता आणि तो अर्चनाने जिंकला होता. जर्मनीविरुद्धच्या लढतीत तिने तिच्यापेक्षा जास्त मानांकन असलेल्या झिओना शानला पराभवाचा धक्का दिला होता.
मला अभ्यासाची प्रचंड आवड असल्याने मी खेळातून निवृत्ती घेत असल्याचे तिने सांगितले. दहावी आणि बारावीच्या परीक्षेमध्ये अर्चनाने अनुक्रमे ९८.७ व ९७ टक्के मिळविले होते. त्यामुळे अभ्यासाकडे तिचा ओढा जास्त होता. अर्थशास्त्रात पदवी घेतल्यानंतर अर्चनाने आंतरराष्ट्रीय संबंध या विषयावर पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. सध्या ती मिशिगनमध्ये दुसऱ्या पदवीचा अभ्यास करत आहे.
मी स्पर्धात्मक टेबलटेनिसमधून केवळ अभ्यासासाठी निवृत्ती घेतली आहे. मला खेळण्यासाठी देखील चांगला पाठिंबा मिळाला. मात्र, आर्थिक ताणामुळे मी खेळातून बाहेर पडत नसल्याचे तिने स्पष्ट करताना, आता केवळ अभ्यासावर लक्ष केंद्रित करण्यासाठी निवृत्ती घेत असल्याचे तिने बोलताना सांगितले.
24 वर्षांची खेळाडू अर्चना म्हणाली, “मला नेहमीच टेबल टेनिसइतकाच अभ्यास करायला आवडतो. मी गेल्या वर्षीही मिशिगनमध्ये या कोर्सबद्दल विचारपूस केली होती, पण त्यानंतर आम्ही प्रथमच संघ म्हणून पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्र ठरलो आणि मला त्यावर लक्ष केंद्रित करायचे होते. आता ऑलिम्पिक संपले आहे, मला आणखी अभ्यास करायचा आहे आणि दोन वर्षांनी भारतात परत यायचे आहे आणि वेगळ्या क्षमतेने लोकांची सेवा करायची आहे. माझ्या निर्णयाचा आर्थिक परताव्याशी काहीही संबंध नाही.
तिच्या निर्णयाचा सन्मान आवश्यक
अर्चनाचे आई आणि वडील दोघेही व्यवसायाने डॉक्टर आहेत. तिचा भाऊ देखील नासामध्ये आहे. त्यामुळे तिचा ओढा अभ्यासाकड़े असणे अपेक्षितच होते. तिच्या निवृत्तीच्या घोषणेने आम्हाला थोडा धक्का बसला. अर्चनाने टेबलटेनिससाठी देखील सर्वकाही दिले. मी आतापर्यंत अनेक खेळाडू पाहिले आहेत, ज्यांनी खेळासाठी सर्वकाही दिले. प्रत्येक खेळाडूंची प्राथमिकता वेगळी असते. तिने घेतलेल्या निर्णयाचा सर्वानी सन्मान करणे आवश्यक असल्याचे तिचे प्रशिक्षक अंशुल गर्ग यांनी सांगितले.





