टी-२० विश्वचषकात भारतीय संघ अपयशी ठरल्याने खेळाडूंसह निवड समितीवरही टीका होत आहे. अनेक माजी खेळाडूंनी संघातील वरिष्ठ खेळाडू तसेच युवा खेळाडूंच्या निवड प्रक्रियेबाबत प्रश्न उपस्थित केले आहेत. दरम्यान, माजी क्रिकेटपटू वसीम जाफरने ( Wasim Jaffer ) भारतीय क्रिकेट संघाबाबत बोलताना मोठी प्रतिक्रिया दिली आहे. वसीम जाफरच्या म्हणण्यानुसार, भारताकडे खूप जास्त प्रतिभावान खेळाडू आहेत आणि त्यामुळेच कोणता खेळाडू निवडायचा आणि कोणता निवडायचा नाही याबाबत व्यवस्थापनाचा प्रत्येकवेळी गोंधळ होतो.
“रोहित, कार्तिक आणि अश्विनने आता टी-२० क्रिकेट खेळणं थांबवावं”, इंग्लंडच्या माजी क्रिकेटपटूचा सल्ला!
तसे पहिले तर भारतीय संघात गेल्या काही महिन्यांत बरेच प्रयोगकरण्यात आले आहेत. यामध्ये संजू सॅमसन, इशान किशन, रवी बिश्नोई, आवेश खान यांच्यासह अनेक युवा खेळाडूंना विविध सामन्यांमध्ये खेळवण्यात आले आहे. त्याचबरोबर सूर्यकुमार यादव आणि ऋषभ पंत यांनीही अनेकवेळा सलामीला खेळवण्यात आले आहे. एवढे सगळे करूनही टीम इंडियाला टी-२० विश्वचषकाचे जेतेपद जिंकता आले नाही आणि संघाला सेमीफायनलमध्ये पराभव पत्करावा लागला.
माजी सलामीवीर वसीम जाफरने ( Wasim Jaffer ) भारतीय संघाच्या खराब कामगिरीबाबत एक मोठे कारण सांगितले आहे. क्रिकट्रॅकरवर बोलताना तो म्हणाला की, “संघ निवडीबाबत आपण खूपच गोंधळात असतो, कारण असे अनेकवेळा घडले आहे. २०१९ विश्वचषक, मागील वर्षीचा टी-२० विश्वचषक, आशिया चषक आणि यावेळी टी२० विश्वचषक स्पर्धेतील निवडीबाबत गोंधळ झाल्याचे दिसले. कारण भारताकडे इतके प्रतिभावान खेळाडू उपलब्ध होते की, कोणी खेळावे आणि कोणी नाही हे समजत नव्हते. अशा प्रकारची समस्या संघासोबत अनेकदा घडली आहे.”
इंग्लंडविरुद्धच्या सेमीफायनल सामन्यात भारतीय संघाला मोठा पराभव स्वीकारावा लागला होता. प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाने १६८ धावा केल्या होत्या. यानंतर इंग्लंडने १६ षटकांत एकही गडी न गमावता १७० धावा केल्या होत्या. सामन्यात भारतीय संघाची गोलंदाजी अत्यंत खराब झाली. कोणत्याही गोलंदाजाकडून वेगवान मारा पाहायला मिळाला नाही. ज्या खेळपट्ट्यांवर वेगवान गोलंदाजीची आवश्यकता होती, त्यावर भारतीय संघाला चांगली कामगिरी करता आलेली नाही.