टी-२० विश्वचषक २०२२ मध्ये भारतीय संघाच्या पराभवानंतर इंग्लंडचे माजी क्रिकेटर मॉन्टी पानेसर यांनी मोठी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी भारतीय संघातील वरिष्ठ खेळाडूंना टी-२० क्रिकेट खेळणे थांबवण्याचा सल्ला दिला आहे. रोहित शर्मा, रविचंद्रन अश्विन आणि दिनेश कार्तिक यांनी यापुढे टी-२० फॉरमॅटमध्ये खेळू नये आणि युवा खेळाडूंना पुढे येण्याची संधी द्यावी, असे पानेसर यांनी म्हटले आहे.
Team India | हार्दिक पंड्या बनू शकतो टी-२० क्रिकेटचा नियमित कॅप्टन, तर रोहितला…
भारतीय संघाला सेमीफायनलमध्ये इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात मोठा पराभव स्वीकारावा लागला होता. सामन्यात पहिल्यांदा फलंदाजी करताना भारतीय संघाने १६८ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात इंग्लंडने १६ षटकांत एकही गडी न गमावता १७० धावा केल्या. या सामन्यात इंग्लंडचे सलामीवीर ऍलेक्स हेल्स आणि जोस बटलर यांनी दमदार फलंदाजी केली होती. यानंतर इंग्लंडने पाकिस्तानला फायनल सामन्यात ५ गडी राखून धूळ चारली. इंग्लंडने दुसऱ्यांदा टी-२० विश्वचषक जिंकला आहे.
दरम्यान, मॉन्टी पानेसर यांनी टीम इंडियाच्या कामगिरीवर टीका करत हा सामना पूर्णपणे एकतर्फी झाला असल्याचे म्हटले. पानेसर म्हणाले की, “रोहित शर्मा, दिनेश कार्तिक आणि आर अश्विन हे असे खेळाडू आहेत ज्यांनी आता टी-२० क्रिकेटला अलविदा म्हणायला हवे. संघ व्यवस्थापन या खेळाडूंबाबत नक्कीच विचार करेल असे वाटते. आता या खेळाडूंनी थांबावं आणि युवा खेळाडूंना खेळण्याची संधी मोलायला हवी.
मॉन्टी पानेसर पुढे म्हणाले की, “भारतीय संघ सर्वांचीच निराशा करत आहे. त्यामुळे माझ्या मते संघातील काही खेळाडू निवृत्तीची घोषणाही करू शकतात. सेमीफायनलमध्ये झालेली इंग्लंडविरुद्धच्या लढत ही पूर्णपणे एकतर्फी होती. बटलर आणि हेल्ससमोर भारताची गोलंदाजी अजिबात प्रभावी वाटत नव्हती. तुम्ही सेमीफायनालाचा सामना खेळत असाल तर कडवी झुंज द्यायला हवी होती. कारण भारतीय संघाची 168 ही धावसंख्या लहान नव्हती.