IND vs AUS Australia beat India in 2nd T20I : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील टी-२० मालिकेतील दुसरा सामना मेलबर्न येथे खेळला गेला. या सामन्यात ऑस्ट्रेलियन संघाने ४ विकेट्सनी सहज विजय मिळवला. या विजयासह ऑस्ट्रेलियाने मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. मात्र, भारताच्या विजयरथाला १७ वर्षांनंतर पहिल्यादांच ब्रेक लागला आहे. या मालिकेतील पहिला सामना पावसामुळे रद्द झाल्याने झाला होता. त्यामुळे आता भारताला मालिका जिंकायची असेल तर उर्वरित तीनही सामने जिंकावे लागतील. १७ वर्षांनंतर भारताच्या विजयरथला लागला ब्रेक – भारतीय क्रिकेट संघाने या सामन्यापूर्वी मेलबर्नच्या ऐतिहासिक एमसीजी मैदानावर एकूण ६ टी२० सामने खेळले होते. त्यापैकी ४ सामने भारताने जिंकले होते, तर फक्त एका सामन्यात पराभव पत्करला होता. हा पराभव २००८ साली झाला होता. त्यानंतर भारतीय संघाने या मैदानावर एकही सामना गमावला नव्हता आणि सलग सर्व सामने जिंकले होते. मात्र, १७ वर्षांनंतर भारतीय संघाच्या विजयरथाला आता ब्रेक लागला आहे. दुसऱ्या टी-२० सामन्याचा आढावा – भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील या सामन्यात ऑस्ट्रेलियन कर्णधार मिचेल मार्शने नाणेफेक जिंकून भारतीय संघाला प्रथम फलंदाजी करण्यास आमंत्रित केले. भारतीय संघाने यावेळी निराशाजनक कामगिरी केली. भारताचा डाव अवघ्या १८.४ षटकांत १२५ धावांवर आटोपला आणि संपूर्ण संघ तंबूत परतला. त्यानंतर धावांचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियन संघाने वेगाने धावा उभारल्या आणि केवळ १३.२ षटकांत ६ गडी गमावून १२६ धावा करून सामना जिंकला. भारताला या सामन्यात ४ गडी राखून पराभव स्वीकारावा लागला. हेही वाचा – IND vs AUS : मिचेल मार्शची खेळी अभिषेकच्या अर्धशतकावर पडली भारी! ऑस्ट्रेलियाने भारताचा उडवला धुव्वा अभिषेक शर्माने मोडला रिझवानचा विक्रम – अभिषेक शर्माने टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केल्यापासून सातत्यपूर्ण कामगिरी केली आहे. ऑस्ट्रेलिया विरुद्ध मेलबर्न टी-२० सामन्यात त्याने दुसरा षटकार लगावताच, पूर्ण सदस्य संघांच्या सलामीवीरांमध्ये एका वर्षात सर्वाधिक षटकार ठोकण्याचा विक्रम आपल्या नावे केला. याआधी हा विक्रम पाकिस्तानच्या मोहम्मद रिझवानच्या नावावर होता, ज्याने २०२१ मध्ये ४२ षटकार ठोकले होते. अभिषेकने २०२५ मध्ये आतापर्यंत ४३ षटकार लगावून रिझवानला मागे टाकले.