Pune District : कनेरसर परिसरात बिबट्यांचा वाढता वावर
Pune District : कनेरसर परिसरातील सेझ क्षेत्रात काही नागरिकांना एकाच वेळी तीन बिबटे दिसल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे शेतकरी, पशुपालक तसेच परिसरातील नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे.

राजगुरुनगर : कनेरसर परिसरातील सेझ क्षेत्र तसेच जालिंदरनगर भागात बिबट्यांचा वावर वाढल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. जालिंदरनगर येथे बिबट्याने एका लहान वासराचा फडशा पाडल्याने या भीतीत आणखी भर पडली आहे. परिसरात तब्बल तीन बिबटे एकत्रितपणे दिसल्याचे नागरिकांनी सांगितले असून, वनविभागाने बिबट्यांच्या बंदोबस्तासाठी पिंजरा बसविला आहे.
कनेरसर परिसरात मागील काही दिवसांपासून बिबट्यांच्या हालचाली वाढल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. जालिंदरनगर परिसरात बिबट्याने वासरावर हल्ला करून त्याला ठार केले. या घटनेमुळे पशुपालकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले असून, रात्रीच्या वेळी शेतात जाण्यास ग्रामस्थ धजावत नसल्याचे चित्र आहे.
कनेरसर परिसरातील सेझ क्षेत्रात काही नागरिकांना एकाच वेळी तीन बिबटे दिसल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे शेतकरी, पशुपालक तसेच परिसरातील नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. शेतीच्या कामासाठी शेतात जाणारे नागरिक आणि जनावरे चारण्यासाठी जाणारे पशुपालक यांच्यामध्येही भीतीचे वातावरण आहे.
कनेरसर ग्रामपंचायत सदस्य उमेश दौंडकर यांनी परिसरातील बिबट्यांच्या वाढत्या वावराची माहिती सामाजिक कार्यकर्ते अशोकराव टाव्हरे यांना दिली. त्यानंतर टाव्हरे यांनी वनपरिक्षेत्र अधिकारी यू. व्ही. जाधव यांच्याशी संपर्क साधून बिबट्यांच्या हालचालींबाबत माहिती दिली. तसेच तातडीने आवश्यक उपाययोजना करण्याची मागणी केली. काही दिवसांपूर्वीच सेझ क्षेत्रात बिबट्याच्या हालचाली निदर्शनास आल्यानंतर वनपरिमंडळ अधिकारी जी. टी. मुके आणि वनरक्षक के. एस. पवार यांनी पाहणी करून पिंजरा बसविला होता. मात्र, बिबट्याने पिंजर्यात प्रवेश केला नाही.
बिबट्या दिसलेल्या ठिकाणी वनविभागाच्या कर्मचार्यांनी पाहणी केल्यानंतर पुन्हा आवश्यक त्या ठिकाणी पिंजरा लावण्यात आला आहे. बिबट्याच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी वनविभागाकडून पाहणी केली जात असल्याचे वनरक्षक के. एस. पवार यांनी सांगितले. वनविभागाने केवळ पिंजरा लावण्यापुरती कार्यवाही न करता बिबट्यांच्या हालचालींचा मागोवा घेऊन आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात. तसेच नागरिकांना सुरक्षिततेबाबत मार्गदर्शन करून बिबट्यांचा बंदोबस्त करण्यासाठी प्रभावी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी ग्रामपंचायत सदस्य उमेश दौंडकर यांनी केली आहे.
भक्ष्य-भक्षक साखळी संपुष्टात आल्याने बिबट्यांचा मानवी वस्तीत वावर वाढला आहे. वनविभागाने या समस्येकडे केवळ तात्पुरता उपाय म्हणून न पाहता बिबट्यांचा मानवी वस्तीत होणारा वावर कमी करण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना राबविणे आवश्यक आहे.
-अशोकराव टाव्हरे, सामाजिक कार्यकर्ते





