पौड : मुळशी तालुक्यातील कोळवण-वाळेन मार्गावरील महत्त्वाचा पूल पाडण्यात आल्यामुळे वाळेन व डोंगरगाव येथील ग्रामस्थांची दयनीय अवस्था झाली आहे. पर्यायी मार्गाची ठोस व्यवस्था न करता पूल पाडल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. पाटबंधारे विभागाने सुरक्षेच्या कारणास्तव सुमारे दोन महिन्यांपूर्वी या पुलाचा स्लॅब पाडला. मात्र या दोन गावांसाठी हा पूलच मुख्य दळणवळणाचा मार्ग असताना पर्याय न देता पूल पाडल्याने ग्रामस्थांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. पूल कोल्हापूर पद्धतीचा बंधारा असल्याचे सांगत पाठबंधारे विभागाने तो वाहतुकीसाठी नसल्याचे स्पष्ट केले आहे. मात्र अनेक वर्षे याच पुलावरून नागरिकांची ये-जा सुरू होती. आता पूल कमकुवत झाल्याचे कारण देत तो बंद करण्यात आला असला तरी नवीन पूल मंजूर होईपर्यंत जुना मार्ग सुरू ठेवणे आवश्यक होते, अशी भूमिका ग्रामस्थ मांडत आहेत. दरम्यान, पाठबंधारे विभाग व बांधकाम विभाग एकमेकांकडे जबाबदारी ढकलत असल्याने प्रशासनाचा भोंगळ कारभार उघड झाला आहे. हेही वाचा : Pradeep Kurulkar: कुरुलकर प्रकरण न्यायदंडाधिकाऱ्यांकडे; एटीएसला आरोपपत्र सादर करण्याचा सत्र न्यायालयाचा आदेश प्रशासनाकडून सध्या सरकारी दवाखान्याच्या बाजूने पर्यायी मातीचा रस्ता तयार करण्यात आला आहे. मात्र हा रस्ता टिकाऊ नसून पावसाळ्यात वाहून जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे वाळेन व डोंगरगाव यांचा संपर्क तुटण्याचा धोका निर्माण झाला आहे. या पुलाच्या बांधकामासाठी सुमारे 4 कोटी रुपयांचा प्रस्ताव तयार करण्यात आला असला तरी अद्याप त्यास प्रशासकीय मान्यता मिळालेली नाही. त्यामुळे कामाची वर्क ऑर्डरही निघालेली नसून प्रत्यक्ष बांधकाम कधी सुरू होणार, याबाबत अनिश्चितता कायम आहे. पावसाळ्यापूर्वी पूल बांधकाम सुरू न झाल्यास दोन गावांचा संपर्क तुटण्याची शक्यता असून विद्यार्थ्यांचे शिक्षण, शेतकर्यांची कामे आणि रुग्णांची हालचाल अडचणीत येणार आहे. त्यामुळे प्रशासनाने तातडीने निर्णय घेऊन पूल बांधकामाला सुरुवात करावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे. हा पूल कोल्हापूर पद्धतीचा बंधारा असून वाहतुकीसाठी नाही. मुदत संपल्याने जीवितहानी टाळण्यासाठी स्लॅब तोडले. – किशोर चव्हाण, सहाय्यक अभियंता, मुळशी पुलाचे काम प्रस्तावित आहे; मात्र अद्याप मंजुरी मिळालेली नाही. – साळुंके, सहाय्यक अभियंता पावसाळ्यापूर्वी पूल झाला नाही, तर आमच्या शिक्षणावर परिणाम होईल. – हर्षल जोरी, विद्यार्थी पर्यायी रस्ता वाहून गेल्यास दळणवळण पूर्णपणे खंडित होईल. – गणेश मोढवे, ग्रामस्थ हेही वाचा : Pune District : लोकअदालतीत 671 प्रकरणे निकाली; राजगुरूनगर येथे विविध प्रकरणांमध्ये दोन कोटींची वसुली