‘सरकारने दखल घेतली नाही तर…’; सुप्रिया सुळेंचा राज्य सरकारला इशारा, शेतकऱ्यांच्या प्रश्नावर म्हणाल्या…

Supriya Sule : राज्यात सर्वत्र पावसाने शेतकऱ्यांवर नामुष्की आणली आहे. मराठवाडा आणि विदर्भातील परिस्थिती भयभीत करणारी आहे. इतक्या मोठ्या प्रमाणावत पाऊस झाला आहे की त्यामुळे अनेक नद्यांना पूर आला असून येथील जनजीवन पूर्णतः विस्कळित झालं आहे.
पूराच्या पाण्यात अकडलेल्यांची एडीआरएफच्या मदतीने शोधमोहिम राबवत त्यांना सुरक्षित स्थळी हलविण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर खासदार सुप्रिया सुळे यांनी राज्य सरकारवर जोरदार टीकास्त्र डागले. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर त्यांनी संताप व्यक्त केला. त्या कोल्हापूर दौऱ्यावर आल्या आहेत. त्यांनी माध्यमांशी संवाद साधत याविषयी भाष्य केलं आहे.
कर्जमाफीचे आश्वासन दिले होते. पण…
सुप्रिया सुळे कोल्हापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आल्या असून त्यांनी श्री अंबाबाई देवीचे दर्शन घेतले. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. हे सरकार पूर्णपणे असंवेदनशील आहे. मागच्यावर्षी कोल्हापुरात याच सरकारने हमीभाव आणि कर्जमाफीचे आश्वासन दिले होते. पण त्याची अंमलबजावणी अजूनही नाही, असं म्हणत सुळेंनी राज्य सरकारला धारेवर धरलं.
…तर आम्ही रस्त्यावर उतरून लढाई लढू
राज्यात सध्या पडत असलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. मागील दोन महिन्यांपासून आम्ही राज्यात ‘ओला दुष्काळ’ जाहीर करण्याची आणि सरसकट कर्जमाफीची मागणी करत आहोत. मात्र, सरकारने अद्याप कोणतीही ठोस पावले उचललेली नाहीत. सरकारने जर वेळेवर दखल घेतली नाही, तर आम्ही रस्त्यावर उतरून लढाई लढू, असा इशारा सुप्रिया सुळेंनी यावेळी बोलताना दिला.
केंद्र सरकारला विनंती केली होती की….
संसदेच्या अधिवेशनात ही मागणी मांडण्यात आली होती. गृहमंत्री आणि सहकार मंत्री अमित शाह यांच्याकडे देशाच्या दोन महत्त्वाच्या खात्यांची जबाबदारी आहे. राज्यावर संकट आल्यानंतर मदतीसाठी केंद्र सरकारकडे पाहावं लागतं. म्हणूनच आम्ही अमित शाह यांच्याकडे विनंती केली होती की, त्यांनी महाराष्ट्र सरकारला शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करण्यास सांगावे, अशी माहिती सुप्रिया सुळेंनी दिली.
हेही वाचा : “हिंदू नाही तर बळीराजा खतरे में है! ओला दुष्काळ जाहीर करा”; रोहित पवारांची मागणी





