मुंबई : राज्यात परतीच्या पावसामुळे बळीराजाचे ऐन दिवाळसणाच्या तोंडावर मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. विदर्भ आणि मराठावाड्यात अनेक शेतकऱ्यांनी सोयाबीन सारखी पिकं काढून ठेवली होती. मात्र, पावसाने हातातोंडाशी आलेला घास हिसकावून घेतला आहे. दरम्यान मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्यात ‘ओला दुष्काळ’ जाहीर करून या शेकऱ्यांना दिलासा द्यावा अशी मागणी करणारे पत्र शिंदे सरकारला दिले आहे.
या पत्रात “ऐन दिवाळीच्या तोंडावर परतीच्या पावसाच्या तडाख्याने महाराष्ट्रातील शेतीचे अपरिमित नुकसान झालं आहे. त्यामुळे राज्य सरकारने युद्धपातळीवर आढावा घेऊन उपाययोजना कराव्यात आणि ‘ओला दुष्काळ’ जाहीर करून माझ्या शेतकरी बांधवांना दिलासा द्यावा”, अशी मागणी राज ठाकरे यांनी केली आहे.
“या वर्षी मान्सूनचा मुक्काम लांबला आणि त्यात परतीच्या पावसाने तर कहर केला. या परतीच्या पावसाने खरीप पिकांचे अपरिमित नुकसान केलं आहे. एकूणच हवामान पाहता रब्बी हंगामाबाबतीतही शेतकरी बांधव चिंतातुर आहे. ऐन पीक काढणीच्या वेळेस हा पाऊस आल्याने शेतकऱ्यांच्या डोळ्यादेखत पीक वाया गेले आहे. यावर सरकारने नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश दिलेले आहेत, हे चांगलच आहे, पण तेवढं पुरेसं नाही. सध्याची परिस्थिती पाहिली तर लक्षात येईल की शेतकऱ्यांचे राज्यभर झालेलं नुकसान मोठं आहे. त्यामुळे राज्य सरकारने ‘ओला दुष्काळ’ जाहीर करावा”, असे राज ठाकरे यांनी पत्रात लिहिले आहे.
ऐन दिवाळीच्या तोंडावर परतीच्या पावसाच्या तडाख्याने महाराष्ट्रातील शेतीचं अपरिमित नुकसान झालं आहे. त्यामुळे राज्य सरकारने युद्धपातळीवर आढावा घेऊन उपाययोजना कराव्यात आणि ‘ओला दुष्काळ’ जाहीर करून माझ्या शेतकरी बांधवांना दिलासा द्यावा. @CMOMaharashtra pic.twitter.com/BsjqkGJWTY
— Raj Thackeray (@RajThackeray) October 20, 2022
“सरकारने पंचनाप्याचे आदेश दिले आहेत, पण पूर्वानुभवानुसार प्रशासकीय पातळीवर ते पंचनामे नीट होत नाहीत. गरजू शेतकरी नेहमीच उपेक्षित राहतो. त्यामुळे सरकारने हे पंचनामे नीट होतील, हे पहावे आणि परिस्थितीचा युद्धपातळीवर आढावा घेऊन राज्यात ‘ओला दुष्काळ’ जाहीर करावा. तसंच कोरडवाहू आणि बागायती शेतीसाठी शेतकऱ्यांना जी प्रतिहेक्टरी नुकसान भरपाई दिली जाते, ती पुरेशी नाही तिचादेखील पुनर्विचार करावा”, अशी मागणीही त्यांनी या पत्राद्वारे केली आहे.
“दिवाळी हा आनंदाचा सण आहे. खरंतर लॉकडाऊनच्या संकटानंतर शेतकरीही दिवाळी धूमधडाक्यात साजरी करण्याच्या मनस्थितीत असणार, अशा वेळी त्यांना दिलासा देऊन त्यांचीही दिवाळी अतिशय आनंदात साजरी होईल याकडे राज्य सरकारने लक्ष द्यावं”, असेदेखील त्यांनी यावेळी म्हटले आहे.