Rajabhau Waje: “विचारधारेशी मी प्रामाणिक”; उद्धव ठाकरेंच्या निष्ठावंत खासदाराचे नाशिकमध्ये जंगी स्वागत
Rajabhau Waje:

Rajabhau Waje: शिवसेनेचा आज 60 वा वर्धापन दिन सोहळा आहे. मात्र चार वर्षांपूर्वी झालेल्या बंडखोरीनंतर शिवसेना दुभांगली गेली. यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ‘ऑपरेशन टायगर’ अंतर्गत पुन्हा एकदा ठाकरेंच्या शिवसेनेतील 6 खासदार फुटले. यावरून या खासरांवर अनेकांकडून संताप व्यक्त करण्यात आला.
मात्र खासदार राजाभाऊ वाजे दिल्लीतील घडामोडीनंतरही उद्धव ठाकरेंसोबतच राहिले. यानंतर ते नाशिकमध्ये दाखल होताच आज सकाळी नाशिक रोड रेल्वे स्थानकावर शिवसैनिकांनी त्यांचे ढोल-ताशांच्या गजरात स्वागत केले.
दरम्यान, शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी, प्रत्येक खासदाराला 15 कोटींचे टोकन आणि 100 कोटींच्या विकासकामांची ऑफर दिली गेली होती, असा आरोप केला. मात्र कोट्यवधी रुपयांच्या ऑफर्स धुडकावून राजाभाऊ वाजे उद्धव ठाकरेशी एकनिष्ठ राहिल्याने अनेकांकडून त्यांचे कौतुक केले जात आहे. Rajabhau Waje
दिल्लीत ते बैठकीसाठी गेले होते. ते जेव्हा नाशिकमध्ये परतले तेव्हा ढोल ताशे वाजवून, गुलाल उधळून त्यांचं स्वागत केलं आहे. पक्षाकडून मिळालेलं प्रेम आणि अशापद्धतीनं केलेलं स्वागत पाहून ते भारावून गेले.
“याआधी कधी मी जे अनुभवलं नव्हतं, ते मी आज अनुभवतोय. खरं तर दरवेळेस रेल्वेनेच दिल्लीला गेलो. रेल्वेनेच आलोय, आणि कोणत्याही प्रोटोकॉलशिवाय मी वागलो.
ज्या विचारधारेतून मी निवडून आलो त्या विचारधारेशी मी प्रामाणिक आहे. उगाच खोटं सांगण्यात काही अर्थ नाही. उद्धवजींबरोबर ठाम आहे. काल मी बैठकीत होतो मी माझ्यापुरतं सांगू शकतो. मी माझ्या पक्षासोबत ठाम आहे. पक्षाने जे मला दिलं ते माझ्या कल्पनाशक्तीपेक्षा जास्त दिलं आहे.
घराची संस्कृती आहे, जे संस्कार दिले आहेत त्या प्रमाणे मी वागलो. कार्यकर्त्यांचं हे स्वागत माझ्यासाठी आनंद देणारे आहे,” अशी प्रतिक्रिया राजाभाऊ यांनी दिली आहे.
भर पत्रकार परिषदेत खासदार वाजे भावूक
दिल्लीत संजय राऊत यांच्या निवासस्थानी झालेल्या पत्रकार परिषदेत संजय राऊत जेव्हा राजाभाऊंच्या निष्ठेचे कौतुक करत होते, तेव्हा राजाभाऊ वाजे यांना भावना अनावर झाल्या. पक्षावर आणि नेत्यावर ओढवलेल्या या परिस्थितीमुळे राजाभाऊ भावूक झाले होते. डोळे पुसतानाचा त्यांचा व्हिडिओ सोशल मिडियावर तुफान व्हायरल झाला होता.
फुटीर खासदारांविरोधात जोरदार घोषणाबाजी
दुसरीकडे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील सहा खासदार फुटल्यानंतर राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. वाशिम, हिंगोली, परभणी आणि बीडमध्ये शिवसैनिक आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. फुटीर खासदारांविरोधात शिवसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी त्यांच्या प्रतिकात्मक पुतळ्यांचं दहन करण्यात आले.
हेही वाचा:







