ढेबेवाडी, (वार्ताहर) – गावाला यशोशिखरावर नेणार्या महिलांना अपघाती आणि नैसर्गिक विमा कवच देऊन, मान्याचीवाडी (ता. पाटण) ग्रामपंचायतीने त्यांचा सन्मान केला आहे. जागतिक महिला दिनानिमित्त 133 महिलांना पाच कोटी 32 लाख रुपयांचे विमा संरक्षण देत, ग्रामपंचायतीने वेगळेपण जपले. गावातील सर्व महिलांना आयुष्यमान भारत कार्ड देण्यात आले असून, पाच लाखांपर्यंतचे उपचार विनामूल्य मिळणार आहेत.
उपक्रमशील गाव अशी मान्याचीवाडीची ओळख आहे. राज्य आणि केंद्र सरकारच्या विविध योजना प्रभावीपणे राबवल्याने ग्रामपंचायतीला आतापर्यंत तब्बल 73 पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. ग्रामस्थांच्या आरोग्यासाठी नावीन्यपूर्ण उपक्रम राबवण्यात आले आहेत.
ग्रामस्थांनी वेळेत पाणी प्यावे म्हणून ग्रामपंचायतीवर भोंगा आणि विद्यार्थ्यांसाठी वॉटर बेल बसवण्यात आली आहे. गावातील सर्वच महिलांच्या रक्ताच्या चाचण्या एकाच वेळी करण्यात आल्या. पर्यावरण संवर्धनासाठी नवदाम्पत्याच्या संसाराची सुरुवात वृक्षारोपणाने, मृत पावलेल्या व्यक्तीच्या नावाने वृक्षारोपण, घरांची वृक्षांच्या नावाने ओळख, अशा उपक्रमांनी गावाने वेगळेपण जपले आहे.
या प्रवासात गावातील महिलांचे योगदान सर्वात मोठे आहे. त्यामुळे ज्येष्ठ महिलांचा मानाचे फेटे बांधून आणि भेटवस्तू देऊन गावकर्यांनी सन्मान केला. यामध्ये नव्वदीतील आजीचाही समावेश होता. जिल्हा परिषद शिक्षण समितीचे माजी सभापती प्राचार्य उत्तमराव माने, माजी सरपंच संगीता पाचुपते, नंदा माने, शशिकला माने यांनी मनोगत व्यक्त केले.
सरपंच रवींद्र माने, ग्रामपंचायत सदस्य दिलीप गुंजाळकर, लता आसळकर, निर्मला पाचुपते, सीमा माने, मनीषा माने, पोलीस पाटील विकास माने, चेअरमन विठ्ठल माने, दादासाहेब माने, सीआरपी अर्चना माने, अंगणवाडी सेविका वंदना पाचुपते, आशा सेविका सुवर्णा माने, ग्रामसेवक प्रसाद यादव उपस्थित होते.
महिलांना विमा संरक्षण
प्रधानमंत्री जीवनज्योती विमा योजनेत 18 ते 50 वर्षे वयोगटातील महिलांचा आरोग्य विमा आणि प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेत 18 ते 70 वर्षे वयोगटातील महिलांचा अपघाती विमा महाराष्ट्र बँकेत काढण्यात आला आहे. या प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले.
मान्याचीवाडी गाव राज्यात ग्रामविकासाचे रोल मॉडेल ठरले आहे. यामध्ये योगदान देणार्या महिलांचा सन्मान करून, गावकर्यांनी स्त्री-पुरुष समानतेचा संदेश दिला आहे. घरांच्या मिळकतींवर पुरुषांबरोबर महिलांना अधिकार देण्यात आला असून, 7/12 उतार्यांवरही महिलांची नावे नोंदवण्याचा ठराव करण्यात आला आहे.- रवींद्र माने, सरपंच, मान्याचीवाडी