मुंबई : भाजपला नगरपंचायती व नगरपरिषदांमध्ये जे पाशवी बहुमत मिळाले, हे यश म्हणजे अजित पवार व एकनाथ शिंदे यांच्यासाठी धोक्याचा इशारा आहे. सोबत घेतलेल्या प्रत्येक मित्रपक्षांचा घात करणे, हाच भाजपचा मूळ स्वभाव असल्याचे टीका कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली. नुकत्याच झालेल्या नगरपंचायती व नगरपरिषदांच्या निवडणूकांमध्ये भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला होता. हे यश भाजपच्या राजकिय इतिहासातील मिळालेले सर्वात अभूतपूर्व यश आहे. आता मुंबई महानगरपालिकेच्या निवडणूकांसाठी आम्ही सज्ज असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले होते. त्यावर कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी तीव्र टीका करताना महायुतीतील दोन्ही मित्रपक्षांना इशारा दिला आहे. तसेच 2029 मध्ये दोन्ही मित्रपक्ष भाजपसोबत दिसणार नसल्याचे भाकित देखील सपकाळांनी केले. महापालिकेच्या निवडणुकीतील आघाडी संदर्भात स्थानिक पातळीवरच्या नेतृत्वाला आम्ही अधिकार दिले असून इंडिया अलायन्ससोबतच वंचित बहुजन आघाडी आणि शेतकरी संघटना यांच्यासोबत आमची चर्चा सुरू आहे, अशी माहिती हर्षवर्धन सपकाळ यांनी दिली. तसेच, होऊ घातलेल्या महानगरपालिकेच्या निवडणुकीत सर्वाधिक जागा काँग्रेस पक्ष जिंकेल, असा विश्वास देखील सपकाळ यांनी व्यक्त केला. कोकाटेंना सरकार वाचवत आहे… राहुल गांधी यांचे सदस्यत्व काही तासात रद्द होते, सुनील केदार यांची देखील आमदारकी रद्द केली जाते. मात्र रम्मीचे आंतरराष्ट्रीय खेळाडू असलेल्या माणिकराव कोकाटे यांची सुरक्षा प्रशासन करताना दिसत आहे. कोकाटेंची सोय होईल, अशी वातावरणाची निर्मिती पोलिसांनी केली. तसेच त्यांना जामीन मिळावा यासाठी सरकार गप्प बसले होते. भाजप हा ‘ना खाऊंगा, ना खाने दूंगा’ या धर्तीवर काम करत नाही. याउलट, मिल बाटके सब खाओ अशी त्यांची भूमिका आहे. एका मंत्राला वाचवण्यासाठी केविलवाणा प्रयत्न हा सत्ताधारी पक्षाचा सुरू आहे, अशीही टीकाही त्यांनी माणिकराव कोकाटे यांच्यावरुन केली.