Harish Rana Euthanasia Case : ‘हरीश राणा आता सन्मानाने मुक्तीच्या मार्गावर’; आई-वडिलांची प्रार्थना बदलली वेदनेत
हरीश राणा गेल्या १२ वर्षांपासून कोमात असल्याने बेशुद्ध आहे. त्याचे वडील, अशोक राणा जेव्हाही आपल्या मुलाच्या प्रकृतीबद्दल बोलतात, तेव्हा त्यांचा कंठ दाटून येतो.

Harish Rana Euthanasia Case – उत्तर प्रदेशातील गाझियाबादच्या राजनगर एक्सटेंशनमधून एक अत्यंत हृदयद्रावक कहाणी समोर आली आहे. इथे आई-वडील आपल्या मुलाच्या जीवनासाठी नव्हे, तर सन्मानपूर्वक सुटकेसाठी प्रार्थना करत आहेत.
एक आई सहसा आपल्या मुलाच्या मुक्तीची मागणी करत नाही, पण जेव्हा मुक्तीपेक्षा जीवनच अधिक वेदनादायी बनते, तेव्हा एक आईसुद्धा जड अंतःकरणाने त्याला देवाकडे परत नेण्यासाठी प्रार्थना करू लागते.
हरिश राणाच्या अंतिम प्रवासासाठी मदत करत असलेल्या सिस्टर लवली म्हणाल्या की, हरीश राणा आणि त्याचं कुटुंब १८ वर्षांपासून प्रजापिता ब्रह्मकुमारी कुटुंबाशी संलग्न आहे. सर्वोच्च न्यायालयाने जेव्हा हरीशला इच्छामृत्यूची संमती दिली तेव्हा आम्ही राणा कुटुंबाला अध्यात्मिक साधनेसाठी बोलवलं.
आम्हाला हे वाटत होतं की हरीश जेव्हा जग सोडून जाईल तेव्हा त्याच्या मनात कुठलंही दुःख किंवा अपराध राहायला नको. त्यामुळेच मी असं म्हणाले की हरीश अब जाओ.. सबको माफ करते हुऐ और सबसे माफी मांगते हुए ठीक है. तसंच घरातून निघताना हरीशच्या कपाळावर मी जो टिळा लावला तो शांतता, सकारात्मक उर्जा यांचं प्रतीक आहे, असंही त्या म्हणाल्या.
हरीश राणा गेल्या १२ वर्षांपासून कोमात असल्याने बेशुद्ध आहे. त्याचे वडील, अशोक राणा जेव्हाही आपल्या मुलाच्या प्रकृतीबद्दल बोलतात, तेव्हा त्यांचा कंठ दाटून येतो. त्यांच्या डोळ्यात अश्रू दाटून येतात आणि ते अनेकदा निःशब्द होतात. एका वडिलांसाठी, आपल्या लहान मुलाला या अवस्थेत पाहणे हा रोजचा वेदनादायी अनुभव बनला आहे.
हरीश राणाची आई, निर्मला देवी, तितक्याच व्यथित आहेत. जेव्हा त्या आपल्या नातवाला शाळेतून आणायला जातात, तेव्हा घरी परत येताना वाटेतच त्यांना अनेकदा रडू कोसळते. जणू काही वर्षानुवर्षे साचलेली वेदना त्यांच्या डोळ्यांतून घराच्या चार भिंतींच्या आतच ओसंडून वाहते.
निर्मला देवी सांगतात की, गेल्या आठ ते दहा वर्षांत त्यांनी आपल्या मुलावर उपचार करण्यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न केले आहेत. मोठ्या रुग्णालयांमध्ये आणि अनेक डॉक्टरांकडून त्याच्यावर उपचार झाले आहेत, पण आता सर्व आशा मावळली आहे. त्या म्हणतात, आता आम्ही फक्त देवाकडे प्रार्थना करतो की त्याला स्वतःहून मुक्ती मिळो.





