कलेढोण – समाजभूषण कै. हणमंतराव साळुंखे हे महाराष्ट्रातील सामाजिक चळवळीचा इतिहास जिवंत ठेवणारे नेते होते, असे गौरवोद्गार माजी मुख्यमंत्री व माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी काढले. Hanmantrao Salunkhe kept the history of social movements alive
समाजभूषण हणमंतराव साळुंखे (तात्या) यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण आणि तृतीय पुण्यस्मरणानिमित्त “स्मृतिग्रंथ’ या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात ते बोलत होते. सुशीलकुमार शिंदे म्हणाले, तात्यांचे शिक्षण पुणे येथील अनाथ विद्यार्थी वसतिगृहात झाल्याने त्यांना देशातील दबलेल्या, अन्याय सहन करणाऱ्या समाजाविषयी आस्था होती. राष्ट्र सेवा दलात काम केल्याने त्यांच्यावर एस. एम. जोशी, डॉ. राममनोहर लोहिया, साने गुरुजी यांसारख्या समाजवादी व संस्कार पुरुषांच्या विचारांची छाप होती. तात्यांनी
महाराष्ट्र व देशाच्या राजकीय, सामाजिक चळवळीत योगदान दिले.
तत्कालीन परिस्थितीन नाभिक समाज रस्त्यावर कुठेतरी काम करणारा कारागीर होता. त्यांना सामाजिक प्रवाहात आणण्यासाठी तात्यांनी संपूर्ण महाराष्ट्रातील नाभिक समाजाचे संघटन केले. एवढेच नाही तर त्यांनी आपल्या गावातील, परिसरातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी शिक्षण संस्था उभा केल्या. शिक्षणाशिवाय समाज सुधारणार नाही, हे माहिती असल्याने केवळ राजकारण न करता ते समाजाच्या गरजा पूर्ण करत राहिले. स्व. यशवंतराव चव्हाण, केशवरावअण्णा यांच्यासोबत त्यांनी प्रजा समाजवादी पक्षातून राजकारण सुरू केले. अष्टपैलू व्यक्तिमत्त्व लाभलेल्या तात्यांनी शेवटपर्यंत सामजिक चळवळ जिवंत ठेवली.
आ. जयकुमार गोरे, गोपीचंद पडळकर, प्रभाकर घार्गे, सुरेंद्र गुदगे यांनी मनोगत व्यक्त केले. सुधाकर कुबेर, अनिल देसाई, शिवाजी सर्वगौड, संदीप पोळ, प्रताप साळुंखे, रामराव पवार, नंदकुमार मोरे, प्रा. बंडा गोडसे, महेश गुरव, एम. आर. देशमुख, भीमराव पाटील, शंकरराव गायकवाड, टी. आर. गारळे, रवींद्र पवार, अशोक गोडसे, शंकर माळी, राजेंद्र लोखंडे, राजेंद्र कणसे, राजेंद्र दबडे, विजय साखरे, रमेश पाटील, सचिन लोखंडे, बाळासाहेब दबडे, संजय टकले, महाराष्ट्रातील नाभिक समाजाचे पदाधिकारी, ग्रामस्थ उपस्थित होते. डॉ. एस. एन. पवार यांनी प्रास्ताविक केले. प्रशांत कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले. चेअरमन संजीव साळुंखे यांनी आभार मानले.