Gulabrao Patil: “शेतकऱ्यांना त्रास झाला तर आम्ही सहन करू, पण आमच्या उद्योजकांना…”; शिंदेंसेनेच्या मंत्र्यांचे अजब विधान
Gulabrao Patil: 'पालकमंत्री महोदयांना चांगलं आठवडाभर उपाशी ठेवलं पाहिजे'; रोहिणी खडसेंनी घेतला समाचार

Gulabrao Patil: शिंदेसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी एका कार्यक्रमादरम्यान केलेले विधान सध्या चांगलेच चर्चेत आले आहे. “वीज मिळणार नसेल तर नवीन उद्योग येणार नाहीत. त्यामुळे एकवेळ शेतकऱ्यांना थोडा त्रास झाला तर आम्ही सहन करून घेऊ पण उद्योजकांना त्रास होऊ देऊ नका,” असं विधान गुलाबराव पाटील यांनी जळगावच्या चिंचोली येथे पॉवर ट्रान्सफॉर्मरच्या लोकार्पणप्रसंगी केले आहे. पाटील यांच्या विधानावरून नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.
पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या वक्तव्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ज्यात एक वेळ शेतकरी सहन करतील पण उद्योजकाला त्रास होतो. त्यांना मजुराला पैसे घ्यायचे असतात. वीज गेली तर पैसे देणार नाही असं त्यांना म्हणता येत नाही. उत्पादनात तोटा होत असतो. अशात वीज मिळणार नसेल तर नवीन उद्योग येणार नाहीत. त्यामुळे एक वेळ थोडासा शेतकऱ्यांना त्रास झाला तर आम्ही सहन करू. पण आमच्या उद्योजकांना त्रास होऊ देऊ नका. एवढीच हात जोडून विनंती असल्याचं पालकमंत्र्यांनी म्हटलं आहे.
शेतकऱ्यांमध्ये नाराजी
उद्योजकांची बाजू घेण्याच्या पालकमंत्र्यांच्या विधानावरून शेतकऱ्यांमध्ये नाराजीचा सूर उमटू लागला आहे. शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळत असली तरी त्यात वारंवार व्यत्यय येतो. दिवसभरातून चार ते पाच वेळा वीज जाते. यामुळे शेतांमध्ये पाणी भरणे अशक्य होते. शेतकरी आणि उद्योजक दोघेही आपापल्या क्षेत्रात गुंतवणूक करतात. शेतकरी कच्चा माल पिकवतो. त्यावर उद्योजक प्रक्रिया करतो. त्यामुळे उद्योजकांच्या बरोबरीने शेतकरी महत्त्वाचा आहे, असं जिल्हा शेतकरी संघर्ष समितीचे निमंत्रक किशोर चौधरी यांनी म्हटलं आहे.
हीच सरकारची शेतकरी शेती विषयीची भूमिका – रोहिणी खडसे
दरम्यान, गुलाबराव पाटील यांच्या या विधानाच शरद पवार गटाच्या नेत्या रोहिणी खडसे यांनी समाचार घेतला आहे. रोहिणी खडसे यांनी गुलाबराव पाटील यांच्या विधानाचा व्हिडिओ शेअर करत लिहिले की, “जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री महोदय काय म्हणतात माहितीये का? शेतकऱ्यांना वीज नसली तरी चालेल, पण उद्योजकांना वीजेचा तुटवडा होता कामा नये! वाह रे वाह… पालकमंत्री महोदयांना चांगलं आठवडाभर उपाशी ठेवलं पाहिजे. मग अन्न धान्य पिकविणाऱ्या शेतकऱ्यांचे महत्त्व त्यांना कळेल.”
पुढे रोहिणी खडसे यांनी लिहिले, “निवडणुकीत शेतकऱ्यांच्या नावाने मते मागायची आणि सत्तेत आल्यानंतर उद्योगपतींच्या मांडीवर जाऊन बसायचे… चांगलंय. या वक्तव्यातून महायुती सरकारचा खरा चेहरा समोर आला आहे. हीच सरकारची शेतकरी शेती विषयीची भूमिका आहे,” असे म्हणत त्यांनी सरकारवरही निशाणा साधला.
हेही वाचा :






