Alka Lamba | Arvind Kejriwal : ‘तुरूंगातून सरकार चालवले जाऊ शकत नाही’; अलका लांबा यांचे महत्वूपूर्ण विधान

Alka Lamba | Arvind Kejriwal – दिल्लीतील पाणी संकट गंभीर झाले असल्याच्या पाश्र्वभूमीवर अखिल भारतीय महिला कॉंग्रेसच्या अध्यक्षा अलका लांबा यांनी महत्वाचे विधान केले आहे. तुरूंगातून सरकारे चालवली जाऊ शकत नाहीत असे त्यांनी म्हटले आहे.
दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पार्टीचे नेते अरविंद केजरीवाल तुरूंगात आहेत. त्यामुळे पाणी संकटावर तोडगा काढण्यासाठी सर्वपक्षीय बैठक बोलावली जावी अशी मागणी लांबा यांनी केली.
त्या पुढे म्हणाल्या की आम आदमी पार्टी आणि कॉंग्रेस पक्षाने भलेही निवडणूक एकत्र लढवली असेल. मात्र हे आपण विसरायला नको की त्यांना दारू घोटाळ्यात क्लीन चीट मिळालेली नाही. कायदा आपले काम करतो आहे.
लांबा म्हणाल्या की पाण्याबाबत तोडगा काढण्यात भाजप आणि आप दोन्ही पक्ष अपयशी ठरले आहेत. सर्वपक्षीय बैठक बोलावूनच त्यावर तोडगा निघू शकतो. आम्ही विरोधी पक्षाचा धर्म पाळतो आहे. दिल्लीत गेल्या दहा वर्षांपासून आम आदमी पार्टीचे सरकार आहे.
टँकरचे माॅनिटरींग केले जाण्याची चर्चा झाली होती. मात्र पाण्याच्या मुद्द्यावर केवळ राजकारण केले जात असून लोकांना त्रास सहन करावा लागतो आहे. पाण्याची कमतरता नाही. पाणी गळती ही समस्या आहे. जलबोर्डातील घोटाळा आणि भ्रष्टाचाराची चौकशी झाली पाहिजे.
दरम्यान, हरियाणा सरकार पाणी सोडत नसल्यामुळे दिल्लीत पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे असा आरोप आपकडून करण्यात आला आहे. हे प्रकरण न्यायालयातही गेले आहे.





