Pune District : वैभव धाडवे तुतारी फुंकणार; भोंगवली गटात शरद पवार गट बेरजेत : मोठी राजकीय उलथापालथ

कापूरहोळ : कामथडी- भोंगवली जिल्हा परिषद गटात येणाऱ्या निवडणुकीत वैभव धाडवे पाटील यांनी हाती तुतारी घेत रणशिंग फुंकले आहे. त्यांच्या घोषणेमुळे स्थानिक राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ उडाली आहे. धाडवे हे तुतारी फुंकणार असल्याने भोंगवली गटात शरद पवार गटाने बेरजेचे राजकारण यशस्वी केले आहे. त्यामुळे जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीत मोठी उलथापालथ होणार आहे.
वैभव धाडवे पाटील हे गेली अनेक वर्षे शैक्षणिक, सामाजिक, सहकार, कृषी, क्रीडा, सांस्कृतिक क्षेत्रात विविध उपक्रमांद्वारे समाजसेवा करीत आहेत. विशेषतः ‘शूरवीर मावळी संघटना’ या सामाजिक संघटनेच्या माध्यमातून त्यांनी अनेक लोकहिताचे उपक्रम राबवले आहेत. जनतेच्या मनात आपलेपणाची छाप निर्माण केली आहे. पत्रकारिता क्षेत्रातही त्यांनी दोन दशकांहून अधिक काळ प्रभावीपणे काम केले आहे. ग्रामीण भागातील समस्या, शेतकऱ्यांचे प्रश्न, सर्वसामान्य जनतेच्या अडचणी यांचा त्यांनी सदैव पाठपुरावा केला आहे.
त्यामुळे ते फक्त पत्रकार म्हणून नव्हे तर जनतेचा एक प्रतिनिधी म्हणून स्वतःची वेगळी ओळख निर्माण करण्यात यशस्वी झाले आहेत.
धाडवे पाटील यांचा ठाम विश्वास आहे की, “जनतेची सेवा आणि गोरगरिबांच्या प्रश्नांवर उपाय शोधणे हेच ध्येय आहे.” स्थानिक जनतेत त्यांचा प्रभाव, त्यांच्यावरील विश्वास आणि निःस्वार्थ कामामुळे गटातून राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) गटाची संपूर्ण ताकद उमेदवार म्हणून धाडवे यांचे पाठीशी उभी आहे. अशी जनमानसात जोरदार चर्चा सध्या रंगत आहे.
आगामी निवडणुकीसाठी कार्यकर्त्यांनीही सर्व पातळीवर तयारी सुरू केली आहे. जनतेचा आशीर्वाद, सेवाभाव हेच माझे खरे बळ आहे, असे सांगत वैभव धाडवे पाटील यांनी राजकीय क्षेत्रात आपली दमदार एन्ट्री केली आहे.
जनतेच्या हितासाठी कटिबद्ध
वैभव धाडवे पाटील म्हणाले की, मी शरद पवार यांचे विचारांना मानणारा आहे. मला शासकीय व प्रशासकीय कामकाजांचा व नेत्यांच्या राजकीय डावपेचाचा अनुभव आहे. शरद पवार यांचे विचार तळागाळापर्यंत पोहचविणार असून जनतेच्या हितासाठी कटिबद्ध आहे. शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे, वरिष्ठ नेते माझ्या पाठीशी खंबीर आहेत. त्यामुळे ही निवडणूक सोपी जाणार असून तुतारी पुणे जिल्हा परिषदेत वाजल्याशिवाय राहणार नाही, असा ठाम विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.





