Pune District : चाकण बसस्थानक की मद्यपिंचा अड्डा? प्रवाशांची गैरसोय; प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे नागरिक संतप्त
Pune District : काही मद्यपी सार्वजनिक ठिकाणी आरडाओरडा, शिवीगाळ तसेच प्रवाशांशी वाद घालत असल्याच्या तक्रारी सातत्याने समोर येत आहेत.

चाकण : औद्योगिक नगरी म्हणून वेगाने विकसित होत असलेल्या चाकण शहरातील प्रमुख एस.टी. बसस्थानकाची अवस्था दिवसेंदिवस बिकट होत असून हे बसस्थानक आता प्रवाशांच्या सुविधेचे केंद्र न राहता भाजी विक्रेत्यांची अनधिकृत बाजारपेठ आणि दारुड्यांचा अड्डा बनल्याची तीव्र नाराजी नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे. त्यामुळे महिला, विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक तसेच हजारो कामगारांना दररोज मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे.
बसस्थानक परिसरात अनेक ठिकाणी भाजी विक्रेत्यांनी हातगाड्या व स्टॉल उभारल्याने प्रवाशांच्या ये-जा करण्याच्या मार्गांवर अतिक्रमण झाले आहे. विशेषतः सकाळी व सायंकाळी गर्दीच्या वेळी परिसराला भाजी मंडईचे स्वरूप प्राप्त होते. बस पकडण्यासाठी धावपळ करणार्या प्रवाशांना गर्दीतून वाट काढावी लागत असून अनेकदा चेंगराचेंगरीसदृश परिस्थिती निर्माण होत असल्याचे चित्र पाहायला मिळते. दुसरीकडे, बसस्थानक परिसरात मद्यधुंद अवस्थेत फिरणार्या व्यक्तींचा वाढता वावर हा सुरक्षेचा गंभीर प्रश्न ठरत आहे.
काही मद्यपी सार्वजनिक ठिकाणी आरडाओरडा, शिवीगाळ तसेच प्रवाशांशी वाद घालत असल्याच्या तक्रारी सातत्याने समोर येत आहेत. त्यामुळे महिला प्रवासी आणि विद्यार्थिनींना असुरक्षित वाटत असल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली आहे. याशिवाय बसस्थानक परिसरात अनधिकृत हातगाड्या, भाजी विक्रेते, रस्त्याच्या कडेला उभी राहणारी जड वाहने आणि कंटेनर यामुळे वाहतूक कोंडी होत असून पादचार्यांसाठी रस्त्यावर चालणेही अवघड झाले आहे.
चाकणमधील हजारो कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील नागरिक दररोज एस.टी. सेवेचा वापर करतात. त्यामुळे बसस्थानकाची सुव्यवस्था राखणे ही प्रशासनाची जबाबदारी असल्याचे मत नागरिकांनी व्यक्त केले आहे. अतिक्रमण हटविणे, भाजी विक्रेत्यांसाठी स्वतंत्र जागा उपलब्ध करून देणे, मद्यपींवर कठोर कारवाई करणे, सीसीटीव्ही यंत्रणेचे प्रभावी निरीक्षण ठेवणे आणि कायमस्वरूपी पोलीस बंदोबस्त ठेवणे या उपाययोजना तातडीने राबविण्याची मागणी होत आहे. चाकणसारख्या वेगाने विकसित होत असलेल्या शहरातील प्रमुख बसस्थानकाची अवस्था चिंताजनक बनली असून प्रवाशांच्या सुरक्षिततेबरोबरच शहराच्या प्रतिमेचाही प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे परिवहन विभाग, नगर परिषद आणि पोलीस प्रशासनाने संयुक्तपणे ठोस पावले उचलून बसस्थानकाला पुन्हा एकदा स्वच्छ, सुरक्षित आणि सुव्यवस्थित बनवावे, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे.
बसस्थानक हे प्रवाशांचे केंद्र असावे, भाजी मंडई किंवा दारुड्यांचा अड्डा नव्हे, अशी संतप्त प्रतिक्रिया अनेक नागरिकांनी व्यक्त केली असून आता प्रशासन या समस्येकडे किती गांभीर्याने पाहते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
बसस्थानक परिसरात नियमित पोलीस गस्त तसेच अतिक्रमणविरोधी कारवाई होत नसल्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाली असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. तक्रारीनंतर काही दिवसांसाठी कारवाई केली जाते; मात्र त्यानंतर पुन्हा पूर्ववत स्थिती निर्माण होत आहे.
-निलेश अरुण सातव, चेअरमन साई रचना कॉम्प्लेक्सबसस्थानक परिसरात भाजी विक्रीमुळे मोठ्या प्रमाणात कचरा साचत असून सांडलेला भाजीपाला, प्लास्टिक पिशव्या तसेच इतर टाकाऊ वस्तूंमुळे स्वच्छतेचा प्रश्न गंभीर बनला आहे. याशिवाय मद्याच्या रिकाम्या बाटल्या आणि इतर कचर्यामुळे परिसराची प्रतिमा मलिन होत आहे. त्यामुळे बसस्थानकाची ओळख प्रवासी केंद्रापेक्षा अस्वच्छ आणि अव्यवस्थित ठिकाण अशी बनत आहे.
-अनिल पोटवड, गाळाधारक
रुग्णालयालाही फटका
चाकण एस.टी. स्टँडच्या इमारतीत रुग्णालय कार्यरत आहे. मात्र, इमारतीच्या तळमजल्यावर दारुड्यांचा आणि बेवारस व्यक्तींचा वावर वाढल्याने रुग्ण, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. या वातावरणामुळे अनेक रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक रुग्णालयात येणे टाळत असल्याचे गाळाधारक सचिन बाळू राक्षे यांनी सांगितले.





