Ghanshyam Shelar : घनःश्याम शेलारांची पुन्हा कोलांटी उडी; काँग्रेसला रामराम करून राष्ट्र्वादीत प्रवेश

योगेश चंदन / श्रीगोंदा, (अहिल्यानगर) : घड्याळ तेच वेळ नवी या राष्ट्रवादीच्या ब्रिद वाक्याप्रमाणे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते घनश्याम शेलार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजित पवार गट) मध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत प्रवेश केला. आतापर्यंत शेलार यांनी एकही पक्ष सोडला नाही की त्यात त्यांनी काम केले नाही.
सर्व पक्षात शेलार यांनी काही काळ काढला पण ते रमले नाही. सारख्या इकडून तिकडे कोलांट्या उड्याच त्यांनी मारल्या आहे. आता या अजितदादा गटात तरी किती दिवस थांबणार हे पुढील काळच सांगेल.
२०१९च्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीकडून निवडणूक लढवत माजीमंत्री बबनराव पाचपुते यांच्याकडून साडेचार हजार मतांच्या फरकाने पराभूत झाले. दरम्यानच्या काळात ‘बीआरएस’मध्ये प्रवेश केला होता. मात्र लोकसभा निवडणुकीच्या अगोदर त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश करून खासदार नीलेश लंके यांचा प्रचार केला.
तर २०२४ विधानसभा निवडणुकीत प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते बच्चू कडू यांच्या उपस्थितीत प्रहार मध्ये प्रवेश करत उमेदवारी अर्ज दाखल केला. मात्र शेलार यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेत बच्चू कडू यांना अवघ्या आठ दिवसांत रामराम करत शिवसेनेच्या उमेदवार अनुराधा नागवडे यांच्या निवडणूक प्रचारात सक्रिय सहभाग घेत आता पुन्हा काँग्रेसकडे केलेल्या प्रवासाला पूर्णविराम देत राष्ट्रवादीत काही निवडक सहकाऱ्यांसोबत अजित पवार यांच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश केला.
भाजपपासून राजकीय प्रवास सुरू झाला तो आजवर अनेक पक्षात डोकावून देखील झाले आहे. शेलार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस प्रवेशाबाबत चर्चा सुरू होती. बुधवारी दि.७ रोजी निवडक कार्यकर्त्यांसह उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे श्रीगोंद्यातील मंदिराच्या विषयी भेट घेण्यासाठी गेलो असता त्यावेळी अजितदादांनी पक्ष प्रवेशाबाबत विचारणा केल्याने शेलार त्यांनी लगेच प्रवेश केला.
पक्षातील जबाबदारी विषयी शेलार यांना विचारले असता त्यांनी पक्षाकडे कसलीच मागणी नसल्याचे सांगत शेलार काय आहे ते दादांना माहिती आहे आणि दादा काय आहेत ते आपल्याला माहिती असल्याने पक्षातील जबाबदारीबाबत त्यांना काही मागायची गरजही नाही आणि आवश्यकता नाही असे ते म्हणाले.
काही लोक सत्तेशिवाय राहू शकत नाही. घनश्याम शेलार हे राष्ट्रवादीत गेले हे फार काही नवल वाटण्यासारखे नाही. त्यांनी आत्तापर्यंत बरेच पक्ष बदलले आहेत. दुसरीकडे कुठे जायचे असा कोणताच पक्ष त्यांच्याकडे राहिला नाही. काँग्रेसमध्ये घुसमट होत असेल त्यांनी माझ्याकडे चर्चा करणे गरजेचे होते. काँग्रेस पक्ष खूप मोठा आहे असे कोणी पक्षात आले आणि गेले त्यानी पक्षाला फार फरक पडत नाही.
जयंत वाघ, काँग्रेस जिल्हाध्यक्ष





