Raj Thackeray : ‘घरात चणचण असते तेव्हाच काटकसर सुरू होते’; राज ठाकरेंचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल
Raj Thackeray : आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी या आवाहनावरून पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला आहे.

Raj Thackeray : भारतीय अर्थव्यवस्थेने चालू आर्थिक वर्षाच्या एप्रिल ते जून या पहिल्या तिमाहीत ७.८ टक्के विकासदर नोंदवल्याने केंद्र सरकारकडून समाधान व्यक्त करण्यात आले. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासीयांना स्वदेशी आणि आत्मनिर्भर भारताला प्रोत्साहन देण्याचे आवाहन केले होते. मात्र, आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी या आवाहनावरून पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला आहे. ( Raj Thackeray)
ठाण्यातील मनसे पदाधिकारी मेळाव्यात बोलताना राज ठाकरे यांनी सरकारच्या आर्थिक दाव्यांवर प्रश्न उपस्थित केले. देशाचा GDP वाढत असल्याचा दावा केला जात असताना नागरिकांना परदेशात प्रवास न करण्याचे आणि सोने खरेदी टाळण्याचे आवाहन का केले जात आहे, असा प्रमुख सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.
घरामध्ये जेव्हा चणचण असते, तेव्हाच काटकसर सुरू होते ना? राज ठाकरेंचा सवाल (Raj Thackeray)
“परदेशातून भारतीयांना सांगायचे की, परदेशात जाऊ नका, सोने खरेदी करू नका आणि भारतात सांगितले जात आहे की, आपल्या देशाचा GDP 7.8 टक्के आहे. जो अमेरिका आणि चीनपेक्षाही जास्त आहे. मग परदेशात का जायचे नाही? मग सोने का खरेदी करायचे नाही? घरामध्ये जेव्हा चणचण असते, तेव्हाच काटकसर सुरू होते ना?” असा सवाल राज ठाकरे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विचारला आहे.
पुढे बोलताना त्यांनी देशाच्या आर्थिक परिस्थितीवरही भाष्य केले. “७.८ टक्के आपला GDP ग्रोथ आहे, मग या देशातील लोकांनी परदेशात का फिरायला जायचे नाही? त्यांनी सोने का खरेदी करायचे नाही? याचे कारण संपूर्ण देशाची आर्थिक परिस्थिती ढासळलेली आहे,” असा दावा राज ठाकरे यांनी केला.
आपण गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे की…
यावेळी बोलताना राज ठाकरेंनी भविष्यातील आर्थिक परिस्थितीबाबतही चिंता व्यक्त केली. “पुढे आर्थिकदृष्ट्या काय काय गोष्टी घडतील, हे पाहावे लागेल. आता फक्त NEETच्या प्रकरणात Gen Z तरुण रस्त्यावर आले आहेत. उद्या अख्खा देश रस्त्यावर येईल. आपण गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे की, आपण नक्की चाललोय कुठे आणि आपण काय करतोय?” असं मोठं विधानही राज ठाकरेंनी केले आहे.
पंतप्रधान मोदींनी काय आवाहन केलं होतं?
काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाच्या आर्थिक विकासाचा वेग कायम ठेवण्यासाठी नागरिकांनी स्वदेशी आणि आत्मनिर्भर भारताच्या धोरणांना अधिकाधिक प्रोत्साहन देण्याचे आवाहन केले होते. परदेशातील अनावश्यक प्रवास टाळावा, विदेशात जाऊन लग्नसोहळे करण्याऐवजी देशातच कार्यक्रम आयोजित करावेत आणि गरज नसल्यास सोने खरेदी करू नये, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले होते. याच आवाहनावरून राज ठाकरे यांनी पंतप्रधान मोदींना सवाल करत देशाच्या आर्थिक परिस्थितीवर प्रश्न उपस्थित केले आहेत.
Asur 3 : ‘असुर 3’मध्ये ‘या’ लोकप्रिय अभिनेत्रीची एन्ट्री; व्यक्त केला आनंद






