जोहान्सबर्ग – दक्षिण आफ्रिका क्रिकेट मंडळावर भारताचे विक्रमादीत्य फलंदाज सुनील गावसकर यांनी संताप व्यक्त केला आहे. भारतीय संघ सध्या दक्षिण आफ्रिकेत असून या दोन संघात टी-20 सामन्यांची मालिका सुरु आहे. पहिला सामना संततधार पावसाने रद्द करावा लागला तर दुसरा सामना पावसाच्या व्यत्ययाने कमी षटकांचा खेळावा लागला. हे सर्व पाहून गावसकर यांनी दक्षिण आफ्रिका क्रिकेट मंडळाला खडे बोल सुनावले आहेत.
पाऊस थांबल्यावर मैदान व आऊटफिल्ड लवकरात लवकर सुकवण्यासाठी ज्या अद्ययावत सुविधा आहेत त्या वेळेवर पुरवल्या का गेल्या नाहीत. जर या सुविधा सज्ज असूनही सामने रद्द होत असतील तर ही गोष्ट गांभीर्याने घेणे गरजेचे आहे. आता ही मालिका संपल्यावर 3 एकदिवसीय सामन्यांची मालिका होत असून त्यानंतर या दोन संघात दोन कसोटी सामन्यांची मालिकाही खेळवली जाणार आहे.
त्यासाठी जी मैदाने निश्चित केली गेली आहेत, तेथे या सुविधा वेळेवर पुरवल्या गेल्या पाहीजेत. तसेच भारतात कोलकातातील इडन गार्डन मैदानावर जी व्यवस्था सज्ज केली गेली आहे तशीच सज्जता आता दक्षिण आफ्रिका मंडळाने त्यांच्या प्रत्येक मैदानावर सुसज्ज राखणे गरजेचे आहे, असेही गावसकर म्हणाले.
दरम्यान, भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील टी-20 मालिकेतील तिसरा सामना आज रात्री 8.30 वाजता (गुरुवार, 14 डिसेंबर) जोहान्सबर्गच्या न्यू वांडरर्स स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. या मालिकेतील पहिला सामना पावसामुळे नाणेफेक न होता रद्द करण्यात आला होता. त्यानंतर दुसऱ्या सामन्यातही पाऊस पडला, त्यानंतर सामन्याचा निकाल डकवर्थ लुईस नियमानुसार सुधारण्यात आला. अशा स्थितीत आज होणाऱ्या तिसऱ्या आणि अखेरच्या टी-20 मध्येही पावसामुळे अडचणी निर्माण होणार आहेत का हे पाहणे औत्सुकतेचे
ठरणार आहे.