संपूर्ण जगामध्ये इस्लामिक राजवट आणण्याच्या एकमेव उद्देशाने कार्यरत असलेली “इस्लामिक स्टेट ऑफ इराक अँड सीरिया’ म्हणजेच “इसिस’ ही दहशतवादी संघटना भारताच्या भूमीवरसुद्धा कार्यरत असल्याचे पुरावे यापूर्वी मिळाले आहेतच. आता नव्याने घडलेल्या काही घडामोडींमुळे इसिस संघटना भारतात पुन्हा एकदा पाय रोवण्यासाठी जोमाने प्रयत्न करत असल्याचे पुरावेही मिळत आहेत. ज्या प्रकारे गेल्या काही दिवसांमध्ये महाराष्ट्रात पुणे, भिवंडी आणि इतर काही ठिकाणी इसिसशी संबंध असण्याच्या संशयावरून काही लोकांना अटक करण्यात आली आहे ते पाहता हा विषय निश्चितच गंभीर मानावा लागणार आहे. पुणे आणि इतर परिसरात ज्या लोकांना अटक करण्यात आली त्यांच्या कार्यपद्धतीचे वर्णन इसिसचे महाराष्ट्र मॉड्युल असे करण्यात येत आहे.
म्हणजेच हे महाराष्ट्राच्या विविध शहरांमध्ये कार्यरत असलेल्या आणि इसिसशी सहानुभूती बाळगणाऱ्या अनेक लोकांनी एकत्र येऊन दहशतवादी कृत्य करण्याचा कट रचल्याचे उघडकीस आले आहे. पोलिसांनी ज्यांना ताब्यात घेतले आहे त्यांच्या चौकशीनंतर उघड झालेल्या माहितीप्रमाणे, देशातील प्रमुख शहरांमध्ये बॉम्बस्फोट घडवण्याचा कट या सर्वांनी रचला होता. पुणे, भिवंडी आणि इतर ठिकाणी ज्या लोकांना अटक करण्यात आली त्यांच्याकडे जी सामग्री मिळाली आहे ती पाहता त्यांचे इरादे निश्चित स्पष्ट होत आहेत. अशा प्रकारच्या घटनांची चौकशी करणारी सर्वोच्च संस्था म्हणजेच एनआयए आणि दहशतवादावर नियंत्रण ठेवण्याचे काम करणारी संस्था एटीएस या दोन्ही संघटनांनी संयुक्तपणे केलेल्या कारवाईमध्ये या लोकांच्या जरी मुसक्या आवळण्यात आल्या असल्या तरी इसिसशी अशाप्रकारे सहानुभूती बाळगणाऱ्यांची संख्या जास्त असू शकते.
या सहा लोकांकडे जे साहित्य मिळाले आहे त्यामध्ये बॉम्ब तयार करण्याची कृती किंवा बॉम्ब तयार करण्याचे साहित्य त्याचबरोबर भारतातील विविध शहरांना मार्क करणारा एक नकाशाही मिळाला आहे. म्हणजेच याच शहरांमध्ये बॉम्बस्फोट घडवण्याचा कट रचण्यात येत होता. गेल्या काही वर्षांच्या कालावधीमध्ये देशातील तपास संस्था आणि पोलीस यंत्रणा अतिशय सतर्क झाल्यामुळे कित्येक वर्षांमध्ये भारतात कोणतेही दहशतवादी कृत्य घडवून आणणे दहशतवाद्यांना शक्य झालेले नाही. याचा अर्थ या संघटना कार्यरत नव्हत्या असा नाही, तर गुप्तपणे त्यांचे कामही सुरू होते. हेच या नव्या घडामोडींमुळे समोर आले आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे या सर्व प्रकरणांमध्ये अटक करण्यात आलेल्यांपैकी काही जणांचे शिक्षण अतिशय कमी असले तरी त्यांच्याकडे तांत्रिक ज्ञान खूप होते. त्याचबरोबर या सर्व सहा जणांमध्ये अटक करण्यात आलेला एक पुण्यातील डॉक्टरही आहे.
डॉ. अदनान सरकार याच्या अटकेमुळे दहशतवादाकडे ओढली जाणारी नवीन पिढी या विषयाची पुन्हा नव्याने चर्चा सुरू झाली आहे. कारण सर्वसाधारणपणे आर्थिक कारणामुळे किंवा आपल्यावर अन्याय झाला आहे या भावनेतून तथाकथित गटातील तरुण सहसा दहशतवादाकडे वळतात. पण ज्या प्रकारे अदनान सरकार याच्यासारख्या डॉक्टरलासुद्धा इसिस सारख्या संघटनेबद्दल सहानुभूती वाटत असल्याचे लक्षात येते तेव्हा हा विषय जास्तच गंभीर होतो. जगाच्या पाठीवर सर्वत्रच कार्यरत असलेल्या दहशतवादी संघटनांनी नेहमीच आपले स्लीपर सेल तयार केलेले असतात. एखाद्या विशिष्ट घटनेनंतर हे स्लीपर सेल जागृत होत असतात. दहशतवादी कारवायांमध्ये भाग घेत असतात. डॉ. अदनान सरकार हे अशाच एका स्लीपर सेलचा भाग असावेत. एनआयए आणि एटीएस यांनी या सहा दहशतवाद्यांच्या मुसक्या आवळल्या असल्या, तरी असे अनेक स्लीपर सेल महाराष्ट्रात आणि देशात ठिकठिकाणी कार्यरत असतील.
या सहा जणांच्या माध्यमातून या स्लीपर सेलपर्यंत पोहोचून त्यांनाही जेरबंद करण्याचे आव्हान आता तपास यंत्रणांना स्वीकारावे लागणार आहे. सत्तेवर असलेल्या पक्षाची धोरणे न पटल्याने किंवा या सरकारचे प्रतिनिधित्व करणाऱ्या काही नेत्यांच्या विधानामुळे आणि कृतीमुळेसुद्धा समाजातील काही घटक अस्वस्थ होत असतात आणि आपोआपच त्यांचा ओढा अशा प्रकारे विघटनवादी शक्तीकडे जात असतो. केवळ आर्थिकदृष्ट्या मागासच नव्हे, तर आयुष्यात यशस्वी झालेल्या काही लोकांनासुद्धा विशिष्ट कारणामुळे अशा दहशतवादी प्रवृत्तीकडे जावेसे वाटत असेल, तर यामागील कारणांचाही शोध या निमित्ताने घ्यावा लागणार आहे. इसिससारख्या संघटनाबद्दल आणि त्यांच्या विचारसरणीबद्दल अशा प्रकारे गुप्तपणे सहानुभूती बाळगणारे आणि स्लीपर सेल म्हणून काम करणारे सर्वात जास्त धोकादायक ठरू शकतात. कारण जेव्हा जेव्हा एखाद्या राज्यात किंवा एखाद्या राज्यातील शहरामध्ये तणावपूर्ण परिस्थिती निर्माण होते किंवा दोन जाती आणि धर्मामध्ये संघर्ष निर्माण होतो तेव्हा अशा संघर्षामध्ये तेल टाकण्याचे काम हे स्लीपर सेल करत असतात.
कारण कोणत्याही कारणाने समाजात अशांतता आणि अस्वस्थता निर्माण करणे हेच त्यांचे एक उद्दिष्ट असते. सध्या ज्या ज्या राज्यांमध्ये अशांतता, दंगलसदृश परिस्थिती दिसत आहे, त्या त्या सर्व ठिकाणी अशाप्रकारचे स्लीपर सेल कार्यरत आहेत का, हे तपासणे गरजेचे बनले आहे. महाराष्ट्रात येत्या काही दिवसांमध्ये गणेशोत्सव आणि नवरात्रीची धामधूम सुरू होईल. देशातही इतरत्र अशाच प्रकारचे विविध धार्मिक उत्सव सुरू होत राहतील. या उत्सवांच्या कालावधीमध्ये गर्दी होण्याचे प्रमाण वाढत असल्याने त्याचाही फायदा अनेक वेळा दहशतवादी संघटनांकडून घेतला जातो. उत्सवाच्या कालावधीमध्ये झालेली एखादी दहशतवादी घटना जास्त परिणामकारक ठरत असते. याचा विचार करूनच आता तपास यंत्रणांना पुण्यात पकडण्यात आलेल्या सहा दहशतवाद्यांच्या माध्यमातून इसिसच्या कटकारस्थानाच्या मुळापर्यंत जाण्याची गरज आहे. एकीकडे प्रतिबंधक उपाय योजले जात असतानाच दुसरीकडे गैरसमजातून इसिसकडे ओढा घेणाऱ्या तरुणांचे समुपदेशनही करण्याला प्राधान्य द्यायची गरज आहे.
काही वर्षांपूर्वी पोलिसांनी अशा प्रकारची समुपदेशन यंत्रणा कार्यरत केल्यानंतर इसिसमध्ये भरती होण्यासाठी चाललेले अनेक जण पुन्हा परत आले होते आणि मुख्य प्रवाहात सामील झाले होते. इसिस सारख्या दहशतवादी संघटनेचे इरादे स्पष्ट असल्याने आणि या संघटनेचे धागेदोरे आता महाराष्ट्रातील पुण्यासारख्या शहरापर्यंत येऊन पोहोचले असल्याने सर्वच पातळीवर कारवाई करून इसिसच्या विचारसरणीची ही पाळेमुळे मुळापासून खणून काढण्याची गरज आहे.