Food Safety: सातार्यात खळबळ! नामांकित दुकानातील बासुंदीला उग्र वास; तक्रारदाराची थेट आयुक्तांकडे धाव
Food Safety: स्थानिक प्रशासनाकडून ९ दिवस उलटूनही ठोस कारवाई नाही; प्रकरणावर पडदा टाकण्यासाठी वकिलामार्फत दबाव आणल्याचा तक्रारदाराचा गंभीर दावा.

Food Safety – ग्राहकांच्या आरोग्याशी थेट संबंधित असलेल्या खाद्यपदार्थाच्या गुणवत्तेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित करणारी तक्रार सातार्यात समोर आली आहे. सातार्यातील प्रसिद्ध फुड प्रॉडक्ट्सच्या बासुंदीला उग्र वास येत असल्याचा, तसेच ग्राहकाला देण्यात आलेल्या पॅकिंगवर उत्पादन दिनांक, अंतिम वापराची तारीख आणि घटकांची माहिती नसल्याचा आरोप करण्यात आला आहे.
याप्रकरणी 30 जुलै रोजी तक्रार दाखल करूनही अद्याप ठोस कारवाई झालेली नसल्याचा दावा करत तक्रारदार राहुल आनंदराव जाधव यांनी थेट अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्याकडे धाव घेतली आहे. जाधव यांनी दिलेल्या निवेदनानुसार, 30 जुलै रोजी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास ते शुक्रवार पेठेतील एका फुड प्रॉडक्ट्स येथे बासुंदी आणि सीताफळ रबडी खरेदी करण्यासाठी गेले होते.
त्यावेळी बासुंदी साध्या पिशवीत देण्यात आली. या पॅकिंगवर खाद्यपदार्थाच्या उत्पादनाची तारीख, अंतिम वापराची तारीख तसेच त्यामध्ये वापरण्यात आलेल्या घटकांची माहिती नसल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. ‘नेमके काय खरेदी केले, कधी तयार झाले आणि किती काळ सुरक्षित आहे?’ असा प्रश्न उपस्थित करत जाधव यांनी दुकानातील कर्मचार्यांकडे विचारणा केली मात्र, समाधानकारक माहिती मिळाली नसल्याचा त्यांचा दावा आहे.
तक्रारीनंतरही कारवाई कुठे?
या घटनेनंतर जाधव यांनी दि. 30 जुलै रोजी सातारा येथील अन्न व औषध प्रशासन कार्यालयात लेखी तक्रार दाखल केल्याचे सांगितले. मात्र, तक्रार करूनही संबंधित आस्थापनेविरोधात अद्याप कोणतीही कारवाई झालेली नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे. त्यामुळे अन्नपदार्थाच्या गुणवत्तेबाबत तक्रार आल्यानंतर प्रशासनाची तपासणी यंत्रणा नेमकी किती तत्परतेने काम करते? असा सवाल उपस्थित झाला आहे. याउलट, संबंधित संस्थेने वकिलामार्फत नोटीस बजावून प्रकरण मिटविण्यासाठी दबाव आणल्याचा आरोपही जाधव यांनी केला आहे.




