Pune District : आभाळाकडे लागले शेतकऱ्यांचे डोळे
Pune District : वेळेत दमदार पाऊस न झाल्यास शेतकऱ्यांच्या उत्पादनावर मोठा परिणाम होण्याची शक्यता असून, वाढत्या उत्पादन खर्चाचीही चिंता शेतकऱ्यांना सतावत आहे.

सोमेश्वरनगर : बारामती तालुक्यातील पश्चिम भागात ऑगस्ट महिन्यात पावसाने पुन्हा दडी मारल्याने शेतकरी चिंतेत सापडला आहे. करंजेपूल, वाकी, चोपडज, पळशी, कानडवाडी आदी परिसरात गेल्या काही दिवसांपासून पावसाची कोणतीही चिन्हे दिसत नसून, ऐन पावसाळ्यात उन्हाचा तीव्र तडाखा जाणवत आहे. परिणामी, खरीप हंगामातील पिकांवर संकटाचे सावट निर्माण झाले आहे.
या भागातील शेकडो हेक्टर शेतीला वरदान ठरलेल्या तसेच अनेक ग्रामपंचायतीच्या पिण्याच्या पाण्यासाठी विहिरींचा, बोअरचा आधार असलेला बाकीचा तलाव तसेच सोमय्याचे तळे कोरडे पडले असून, पावसाअभावी या भागातील पिकांना पाण्याची तीव्र गरज भासत आहे. काही ठिकाणी विहिरींची पाणीपातळीही खालावू लागल्याने पिके करपण्याच्या मार्गावर आहेत. वेळेत दमदार पाऊस न झाल्यास शेतकऱ्यांच्या उत्पादनावर मोठा परिणाम होण्याची शक्यता असून, वाढत्या उत्पादन खर्चाचीही चिंता शेतकऱ्यांना सतावत आहे.
पावसाअभावी शेतीबरोबरच पशुधनासमोरही चाऱ्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. शेळ्या-मेंढ्यांसह इतर जनावरांसाठी हिरवा चारा कमी पडू लागल्याने पशुपालकांची चिंता वाढली आहे. पावसाने आणखी ओढ दिल्यास परिसरात चाराटंचाईची परिस्थिती गंभीर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, दिवसभर वाढलेल्या उकाड्यामुळे नागरिकही त्रस्त झाले आहेत. वाढत्या उष्णतेमुळे नागरिकांच्या अंगातून घामाच्या धारा वाहत असून, शीतपेयांच्या मागणीत वाढ झाली आहे. बदलत्या वातावरणाचा लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांवर विशेष परिणाम होत असून, सर्दी, ताप, अंगदुखी आणि डोकेदुखीच्या तक्रारी वाढत असल्याचे चित्र आहे.
पावसाळ्याच्या दिवसांत अपेक्षित असलेला पाऊस गायब होऊन उन्हाळ्यासारखी परिस्थिती निर्माण झाल्याने शेतकरी आणि नागरिकांचे डोळे आता आभाळाकडे लागले आहेत. येत्या काही दिवसांत दमदार पाऊस झाला नाही, तर खरीप पिकांसह पशुधनाच्या चाऱ्याचा प्रश्न अधिक गंभीर होण्याची शक्यता आहे.





