नगर – ग्रामीण भागात शेतीला जोड धंदा म्हणून दूध धंद्याकडे पाहिले जाते. मात्र, दूधदरात सातत्याने होत असलेली घसरण पाहता शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. कारण दुधाला मिळणारे दर व पशुखाद्याचे दर गगनाला भिडले असून, जनावरे पाळणेसुद्धा शेतकऱ्याला मुश्किल झाले आहे. ओल्या चाऱ्याचे दरसुद्धा वाढल्याने शेतकरी मेटाकुटीला आला आहे.
ग्रामीण भागात दुधाला दूध संघाचा 35 रुपये दर मिळत होता. आता मात्र दुधाला मागणी घटल्याने दर तीन ते चार रुपयांनी घटले आहेत. आता दुधाला 30 ते 31 रुपये दर मिळत आहे. त्यामुळे दूध धंदा परवडत नाही. ओल्या चाऱ्याचे आणि पशुखाद्याचे दर पाहता यांचा ताळमेळ बसत नाही.
ग्रामीण भागातील शेतकऱ्यांचे अर्थकारण सर्व काही दूध धंद्यावर चालते. मात्र, दुधाचे दर कमी झाल्याने शेतकरी राजा हातबल झाला आहे. हिरवा चाराही महागल्याने दुभती जनावरे पाळणेसुद्धा कठीण झाले आहे.
ग्रामीण भागात शेतीला जोड धंदा म्हणून दूध धंद्याकडे पाहिले जाते. मात्र, आता दुधाचे दर कोसळल्याने शेतकरी पूर्णपणे कोलमडला पडला आहे. पशुखाद्याचे दर वाढल्याने जनावरे पाळणेसुद्धा मुश्किल झाले. याचा विचार करून सरकारने दुधाचे दर निश्चित करणे गरजेचे आहे. सोनई भागातून मोठ्या प्रमाणावर दूधसंकलन केले जाते. या भागातील बरेचसे अर्थकारण दूध धंद्यावर अवलंबून आहे.