Eknath Shinde : महायुतीत गृहमंत्रिपदावरुन धुसफूस ! शिंदेसेने अजूनही आग्रही, वर्षावर खलबत सुरूच

Eknath Shinde – राज्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीला बहुमत मिळाले. मात्र या शपथविधी सोहळ्यावेळी या तिघांव्यतिरिक्त एकाही मंत्र्याने शपथ घेतली नाही. तसेच अद्याप खातेवाटप कधी होणार, मंत्रिमंडळ विस्तार कधी होणार असे प्रश्न उपस्थितीत होत आहेत.
त्यातच आता महाराष्ट्राचे गृहमंत्रीपद कोणाकडे जाणार, याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. गेल्या काही दिवसांपासून महायुतीत गृहमंत्रिपदावरुन धुसफूस सुरु असल्याचे पाहायला मिळत आहे.
विधानसभा निवडणुकीत महायुतीला बहुमत मिळाले. यात भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला. त्यामुळे मुख्यमंत्रीपद भाजपकडे गेले. यामुळे महायुतीचे घटकपक्ष असलेल्या शिवसेना शिंदे गटाने उपमुख्यमंत्रिपदासह गृहमंत्रीपदावर दावा केला होता. मात्र भाजपने शिंदे गटाला गृहमंत्रिपद देण्यास नकार दिला.
त्याऐवजी दुसरं खातं देऊ असे सांगण्यात आले. पण शिंदे गटाने त्यांची मागणी तशीच ठेवली. त्यातच आता काल रात्री वर्षा निवासस्थानी एक बैठक पार पडली. या बैठकीतही एकनाथ शिंदे गृहमंत्रीपदाबाबत अजूनही आग्रही असल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांची दिली आहे.
दुसरीकडे गृहखाते न देण्यावर भाजप ठाम आहे. त्याऐवजी महसूल आणि इतर खाती घ्या, असा सल्ला देवेंद्र फडणवीसांनी एकनाथ शिंदे यांना दिला आहे. सध्या गृहमंत्रिपदावरुन एकनाथ शिंदे यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न सुरु आहे.
याच पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा बैठक होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान येत्या १२ डिसेंबरला शपथविधी पार पडणार आहे. त्यापूर्वी जर गृहखात्याचा तिढा सुटला नाही, तर मंत्रीमंडळ विस्तार पुढे ढकलला जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.





