मुंबई – महाराष्ट्रात दुष्काळसदृश परिस्थिती असल्याने कांदा, डाळी, साखर, फळे आणि भाजीपाल्याचा पुरवठा कमी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या वस्तूंच्या किमती वाढू शकतात. वास्तविक, महाराष्ट्र याचा मुख्य उत्पादक आहे. शिवाय कर्नाटकातून होणारा पुरवठाही कमी होण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्रातील जलसाठ्याची पातळीही गेल्या वर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत 20% कमी आहे. रब्बी हंगामात पाच एकरात कांद्याची लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांनी दोन एकरातच कांदा लावला आहे. गेल्या सहा-सात वर्षांत प्रथमच, व्यापाऱ्यांना 50% कांदा बियाणे कंपन्यांना परत करणे भाग पडले आहे.
महाराष्ट्रात मान्सून सामान्य होता; पण मराठवाडा, मध्य महाराष्ट्र व उत्तर महाराष्ट्रात अत्यल्प पाऊस झाला. त्यामुळे पेरणी व साखरेचे उत्पादन घटणे निश्चित आहे, तर गहू, हरभरा या पिकांच्या पेरण्याही कमी झाल्याचे संकेत मिळत आहेत.
महाराष्ट्रात गव्हाचे उत्पादन फारसे होत नाही. मात्र, यातील कपातीचा परिणाम इतर राज्यांमध्येही दिसून येईल. कर्नाटकात वाटाणा व हरभऱ्याचे उत्पादनही 10-15% कमी होईल. ऑक्टोबरमध्ये कांद्याचे भाव 42% वाढले आहेत. त्याच वेळी, ग्राहक अन्न किंमत निर्देशांक एक वर्षापूर्वीच्या तुलनेत 6.6 टक्क्यांनी वाढला आहे.
साबण, डिटर्जंट, शॅम्पूचे दर घटतील
कंतार वर्ल्डपॅनलच्या अहवालानुसार, डिटर्जंट बार, वॉशिंग पावडर, बिस्किटे आणि साबण या स्थानिक ब्रॅंडमध्ये जुलै ते सप्टेंबर या कालावधीत 4% ते 31% वाढ झाली आहे. यामुळे मोठ्या कंपन्यांनी किमती 3-11% ने कमी केल्या आहेत.
तज्ज्ञांच्या मते दोन-तीन महिन्यांत त्यात आणखी घट होईल. त्यामुळे 5 लाख कोटींच्या एफएमसीजी बाजारात स्थानिक ब्रॅंडच्या वाढीचे फायदे ग्राहकांना मिळू लागतील. साबण, डिटर्जंट, केसांचे तेल, बिस्किटे, शॅम्पू आदींच्या किमती कमी होतील, अशी शक्यता आहे.