Rahul Gandhi : इंडिया आघाडीतील पक्षांच्या वक्तव्यांवर प्रतिक्रिया नको ! राहुल यांचा कॉंग्रेस खासदारांना सल्ला

Rahul Gandhi – विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीत सध्या नेतृत्वाच्या मुद्द्यावरून धुसफूस सुरू झाल्याचे चित्र आहे. अशात लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी कॉंग्रेसच्या खासदारांना महत्वाचा सल्ला दिला. आघाडीतील इतर पक्षांच्या दुसऱ्या फळीतील, कनिष्ठ स्तरावरील नेत्याकंडून होणाऱ्या वक्तव्यांवर प्रतिक्रिया देऊ नका, अशी सूचना त्यांनी केली.
राहुल यांनी मंगळवारी कॉंग्रेसच्या लोकसभा खासदारांची बैठक घेतली. त्यामध्ये बोलताना त्यांनी इंडिया आघाडीत संख्याबळाच्या दृष्टीने कॉंग्रेस सर्वांत मोठा पक्ष असल्याची बाब अधोरेखित केली. आघाडीशी संबंधित मुद्दे हाताळण्यास कॉंग्रेस सक्षम असल्याची ग्वाहीही त्यांनी दिली. राहुल यांनी खासदारांना दिलेल्या सल्ल्यामुळे कॉंग्रेस आघाडीतील इतर घटक पक्षांशी तणातणी होणार नाही याची दक्षता घेत असल्याचे सूचित झाले.
इंडिया आघाडीचे नेतृत्व पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्याकडे सोपवावे, अशी मागणी त्यांच्या तृणमूल कॉंग्रेसमधील नेत्यांनी पुढे केली आहे. त्यातून आघाडीतील इतर घटक पक्षांकडून वेगवेगळी भूमिका मांडली जात आहे. त्यामुळे नेतृत्वाच्या मुद्द्यावर आघाडीच्या स्तरावर चर्चेला तोंड फुटल्याचे दिसून येत आहे.





