DJ Noise Pollution: हिंजवडीतील ‘त्या’ दोन मृत्यूंचं प्रकरण दाबण्याचा प्रयत्न? गणेशोत्सवापूर्वी शहरात डीजेवरून मोठा वाद
DJ Noise Pollution: चिंचवडचे आदर्श उदाहरण बाजूला सारून उपनगरांमध्ये ध्वनीप्रदूषणाचे नियम धाब्यावर; नागरिकांची स्वाक्षरी मोहीम अन् थेट बंदीची मागणी.

DJ Noise Pollution – शहरात सण-उत्सवांचा उत्साह शिगेला पोहोचला असतानाच, डीजेच्या अक्राळविक्राळ भिंती आणि कानठळ्या बसवणाऱ्या आवाजाने नागरिकांचे जगणे असह्य केले आहे. महापुरूषांचा जयंत्या, ईदचा जुलूस ते अगदी गणेश विसर्जनापर्यंत सर्वच मिरवणुकांमध्ये डीजेचा अनिर्बंध वापर सुरू आहे. आता दहीहंडी आणि गणेशोत्सव हे मोठे सण येत आहेत. डीजेचा आवाज कधी-कधी प्राणघातकही होतो.
यामुळे यंदा तरी डीजेच्या आवाजाला लगाम लागणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. डीजेच्या आवाजाच्या पार्श्वभूमीवर पुण्यात ज्याप्रमाणे नागरिकांनी रस्त्यावर उतरून स्वाक्षरी मोहीम राबविली आहे. तसेच थेट बंदीची मागणी लावून धरली आहे, मात्र, बंदीच्या या मागणीविरोधात काही मंडळांचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत.
एकेकाळी ढोल-ताशा, लेझीम आणि टाळ-मृदंगाच्या गजरात भक्तीभावाने निघणाऱ्या मिरवणुकांचे स्वरूप आता पूर्णपणे बदलले आहे. पारंपरिक संस्कृती मागे पडून डीजेच्या भिंती उभारण्याची चढाओढ लागली आहे. विसर्जन मार्गांवर अवाढव्य ध्वनिक्षेपकांचा थरथराट सुरू असतो. काही ठिकाणी वाजवली जाणारी अश्लील आणि कर्णकर्कश गाणी उत्सवाचे पावित्र्य नष्ट करत असल्याची भावना सुजाण नागरिक व्यक्त करत आहेत.
चिंचवडचा आदर्श, इतर भागांत मनमानी
चिंचवड गावातील विसर्जन मिरवणुकीत पारंपरिक वाद्यांचा आणि शिस्तीचा वापर करून एक चांगला पायंडा पाडला गेला आहे. मात्र, पिंपरी, भोसरी, निगडी, आकुर्डी, काळेवाडी आणि सांगवी परिसरामध्ये विसर्जन मिरवणुकांमध्ये नियमांचे उघड उल्लंघन होताना दिसते. शहराच्या उपनगर परिसरामध्ये वेगवेगळ्या दिवशी विसर्जन होते. सहाव्या दिवसापासून ते अनंत चतुर्दशीपर्यंत होणाऱ्या विसर्जन मिरवणुकीपर्यंत डीजेचा दणदणाट सुरू असतो. मर्यादेपेक्षा कित्येक पटीने जास्त डेसिबलचा आवाज रात्रभर सुरू असतो.
हिंजवडीत दोन जणांचा मृत्यू?
राज्यात डीजेच्या आवाजामुळे अनेकांचा मृत्यू झाल्याची नोंद आहे. दोन वर्षांपूर्वी हिंजवडी परिसरात मिरवणुका सुरू असताना दोन नागरिकांचा मिरवणुकीत मृत्यू झाला होता. मात्र हे प्रकरण दडपण्यात आले. डीजे हे आजच्या तरुणाईच्या जल्लोषाचे माध्यम असून त्यावर सरसकट बंदी घालणे अयोग्य आहे, असा पवित्रा मंडळांनी घेतला आहे.
पोलीस यंत्रणा हतबल, राजकीय हस्तक्षेपाचा आरोप
ध्वनीप्रदूषणाचे नियम कागदावर स्पष्ट आहेत. सर्वोच्च न्यायालयाचे कडक आदेश असतानाही प्रत्यक्ष कारवाई मात्र नगण्य दिसते. पोलीस ठाण्यांमध्ये शेकडो तक्रारी नोंदवूनही कारवाई होत नाही. यामागे स्थानिक राजकीय नेत्यांचा दबाव आणि मंडळांना मिळणारा वरदहस्त कारणीभूत असल्याचा थेट आरोप ज्येष्ठ नागरिक करत आहेत.






