Rakhi To Potholes: “खड्डेराया तूच आमचे रक्षण कर!” आयटीनगरीत लाडक्या बहिणींनी थेट खड्ड्यांनाच बांधली राखी
Rakhi To Potholes: वारंवार मागण्या करूनही प्रशासन ढिम्म राहिल्याने हिंजवडी आणि माणमधील महिलांनी रस्त्यावरील खड्ड्यांना राखी बांधून व पुष्पहार अर्पण करून अनोखे आंदोलन केले.

Rakhi To Potholes – आयटी परिसरातील रस्त्यांवरील खड्डे बुजविण्यासाठी वारंवार तक्रारी, निवेदने आणि मागण्या करूनही प्रशासनाच्या कारभारात अपेक्षित सुधारणा होत नसल्याने, आयटीनगरी माण हिंजवडीतील काही महिलांनी थेट रस्त्यावरील खड्डयांनाच राखी बांधून अनोखे आंदोलन केले. ” खड्डेराया आता तूच आमचे रक्षण कर ” असा उपरोधिक साकडे घालत राज्य सरकार व स्थानिक प्रशासनाला केला आहे.
माणगावात महाविकास आघाडीचे नेते यशराज पारखी व शिवाजी भिलारे यांच्या नेतृत्वात महिलांनी रस्त्यातील खड्डड्यांना राखी बांधून पुष्पहार अर्पण करून अनोखे आंदोलन केले. रक्षाबंधन सणाच्या निमित्ताने हिंजवडी आणि माणमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या लाडक्या बहिणींच्या या अनोख्या प्रतिकात्मक आंदोलनामुळे आयटी परिसरातील प्रशासनाचे अक्षरशः वाभाडे निघाले आहे.
यातून, झोपेचे सोंग घेतलेले प्रशासन आतातरी जागे होईल. अशी अपेक्षा आयटीयन्स व महिला वर्गातून व्यक्त केली जात आहे. पावसाळ्यात रस्त्यांवर मोठमोठे खड्डे पडल्याने वाहनचालकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. खड्ड्यांमुळे वाहतुकीचा वेग मंदावून दररोज तासनतास वाहतूक कोंडी होत आहे. रस्ते दुरुस्ती आणि खड्डे बुजविण्याबाबत प्रशासन,
शासन तसेच लोकप्रतिनिधींकडे अनेकदा मागण्या करण्यात आल्या. निवेदने देण्यात आली मात्र, ठराविक रस्ते वगळता परिस्थितीत फारसा बदल झालेला दिसत नसल्याने अखेर आयटीनगरीतील स्थानिक महिलांनी खड्ड्याला राखी बांधून त्याचे औक्षण करत अनोखे रक्षाबंधन साजरे केले.
हिंजवडीच्या माजी उपसरपंच दीपाली जांभुळकर तसेच माण मधील महिलांच्या या अनोख्या रक्षाबंधनाची परिसरात जोरदार चर्चा सुरू असून सोशल मीडियावर याबाबत अनेक प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. या उपहासात्मक आंदोलनातून तरी प्रशासन जागे होईल का? हिंजवडीसह परिसरातील रस्ते खड्डेमुक्त होतील का? याकडे, तमाम आयटीयन्ससह स्थानिक ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.
“अनेकदा मागणी करून, खड्डेमय रस्त्याबाबत लक्ष वेधून सुद्धा संबंधित प्रशासन जागे होताना दिसत नाही. त्यामुळे, हजारो स्थानिक महिलांच्या वतीने हिंजवडीमध्ये उपहासत्मक आंदोलन केले. यातून, संबंधित जबाबदार प्रशासनाने योग्य तो बोध घ्यावा ही अपेक्षा.”
– दिपाली शरद जांभुळकर, माजी उपसरपंच, हिंजवडी
“चांदे माण व माण म्हाळुंगे रस्त्यांची खड्ड्यांमुळे दूरवस्था झाली आहे. कोणीच यावर गांभीर्याने घेताना दिसत नाही. खराब रस्त्यामुळे दैनंदिन वाहतूक कोंडी आणि अपघाताला आयते निमंत्रण मिळत आहे. प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी हे आंदोलन केले आहे. या माध्यमातून तरी एमआयडीसी व पीएमआरडीए प्रशासन जागे होईल अशी अपेक्षा आहे.”
– माया पारखी, गृहिणी- आयटीनगरी, माण






