Dimbhe Manikdoh Tunnel: आंबेगाव तालुक्यातील शेतकऱ्यांचा मोठा विजय! राज्य मंत्रिमंडळाचा डिंभे-माणिकडोह प्रकल्पावर मोठा निर्णय
Dimbhe Manikdoh Tunnel: तांत्रिक, पर्यावरणीय आणि सिंचन व्यवस्थेचा नव्याने अभ्यास होणार; पुनरावलोकनानंतरच पुढील निर्णय घेण्याचे प्रशासनाचे संकेत.

– रमेश जाधव
Dimbhe Manikdoh Tunnel – डिंभे–माणिकडोह जोड बोगदा प्रकल्पाच्या कामाला राज्य सरकारने अखेर स्थगिती देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. या प्रकल्पाला स्थानिक नागरिक, शेतकरी आणि विविध संघटनांकडून सातत्याने विरोध होत असताना माजी मंत्री तथा आमदार दिलीप वळसे-पाटील यांनीही प्रकल्पाविरोधात ठाम भूमिका घेतली होती. त्यानंतर राज्य मंत्रिमंडळाने या प्रकल्पाचे काम तात्पुरते थांबवण्याचा निर्णय घेतल्याची माहिती समोर आली आहे.
डिंभे धरणातील पाणी माणिकडोह धरणात वळविण्यासाठी जोड बोगदा उभारण्याची योजना राज्य सरकारच्या विचाराधीन होती. या प्रकल्पामुळे पाण्याचे अधिक प्रभावी नियोजन होईल, असा दावा प्रशासनाकडून करण्यात आला होता. मात्र या योजनेमुळे डिंभे धरण परिसरातील शेतकरी, पाणी वापर संस्था आणि स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र नाराजी होती.
सिंचनासाठी उपलब्ध असलेल्या पाण्यावर परिणाम होण्याची भीती व्यक्त करत अनेक आंदोलनेही करण्यात आली. या पार्श्वभूमीवर आंबेगाव तालुक्याचे आमदार दिलीप वळसे पाटील यांनी मुख्यमंत्री आणि संबंधित विभागाकडे प्रकल्पाला विरोध दर्शविला. स्थानिकांच्या भावना लक्षात घेऊन प्रकल्पाचा पुनर्विचार करावा, अशी मागणी त्यांनी वारंवार केली होती.
अखेर मंत्रिमंडळाच्या बैठकीत या विषयावर चर्चा होऊन बोगद्याच्या कामाला स्थगिती देण्याचा निर्णय घेण्यात आला. या निर्णयामुळे प्रकल्पाला विरोध करणाऱ्या शेतकरी आणि नागरिकांनी समाधान व्यक्त केले असून, सरकारने जनभावनांचा आदर केल्याची प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.
नव्याने अहवाल..
दरम्यान, सरकारकडून या प्रकल्पाचा तांत्रिक, पर्यावरणीय आणि सिंचन व्यवस्थेवर होणाऱ्या परिणामांचा नव्याने अभ्यास केला जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. अभ्यास अहवालानंतरच पुढील निर्णय घेतला जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे की, डिंभे धरणातील पाणी हे आंबेगाव तालुक्यासाठी जीवनवाहिनी आहे. त्यामुळे कोणताही निर्णय घेताना स्थानिक शेतकरी आणि पाणी वापरकर्त्यांचा विश्वासात घेणे आवश्यक आहे.






