Sugarcane Fire: ४ एकर ऊस खाक होणार होता, पण…; आंबेगाव तालुक्यातील शेतकऱ्यांच्या ‘त्या’ धाडसाने टळला मोठा अनर्थ
Sugarcane Fire: आंबेगाव तालुक्यातील लौकी येथे मधलामळा परिसरात अज्ञात समाजकंटकांनी लावली उसाच्या पिकाला आग; शेतकऱ्यांमध्ये प्रचंड संताप.

Sugarcane Fire – लौकी (ता.आंबेगाव) येथील मधलामळा गवळीबाबा मंदिराजवळील शेतशिवारात अज्ञात समाजकंटकांनी उसाच्या पिकाला आग लावल्याची घटना शनिवार, दि.५ रोजी रात्री अकरा वाजता घडली. ऊस पेटल्याचे लक्षात येताच परिसरातील शेतकऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत आग विझविण्यास सुरुवात केली. शेतकऱ्यांनी दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे आग आटोक्यात आणण्यात यश आले असून चार एकर क्षेत्रातील ऊस जळण्याचा धोका टळला.
शेतकऱ्यांसाठी ऊस हे महत्त्वाचे नगदी पीक असून, वर्षभर केलेल्या मेहनतीनंतर त्यातून उत्पन्न मिळते. अशा परिस्थितीत पिकाला आग लागल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले. आग वाढत गेल्यास परिसरातील इतर उसाच्या क्षेत्रालाही त्याचा फटका बसण्याची शक्यता होती. मात्र, वेळीच आग लागल्याची लक्षात आल्याने शेतकरी रामचंद्र थोरात आणि संतोष थोरात यांनी विलंब न करता आग विझविण्याचे प्रयत्न सुरू केले.
घटनेची माहिती मिळताच परिसरातील शेतकरी राजेंद्र थोरात,निलेश थोरात,रुपेश थोरात,ओंकार थोरात हे घटनास्थळी जमा झाले. ओला झाडपाला, पाणी आणि इतर उपलब्ध साधनांच्या मदतीने शेतकऱ्यांकडून आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न करण्यात आले. वाऱ्याचा वेग वाढला असता आग मोठ्या क्षेत्रात पसरण्याची शक्यता होती. मात्र, शेतकऱ्यांच्या तत्परतेमुळे परिस्थिती नियंत्रणात आली.
या घटनेमागे नेमका कोणाचा हात आहे, याबाबत अद्याप स्पष्टता नसली तरी अज्ञात व्यक्तींनी जाणीवपूर्वक आग लावल्याचा संशय शेतकरी रामचंद्र गणपत थोरात,शिवाजी कोंडाजी थोरात आणि सुमन थोरात यांच्याकडून व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे संबंधित यंत्रणेने घटनेची सखोल चौकशी करून आग लावणाऱ्यांचा शोध घ्यावा, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे. कष्टाने उभे केलेले पीक जाळण्याचा प्रयत्न झाल्याने शेतकऱ्यांमध्ये संतापाचे वातावरण आहे. शेतीचे नुकसान करण्याच्या घटनांमध्ये सहभागी असणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात येत आहे.





