जामखेड – धनगर आरक्षणप्रश्नी चोंडीत चालू असलेल्या आंदोलनाकडे सहाव्या दिवशीही सरकार दुर्लक्ष करत असून, हे सरकार निर्दयी सरकार असल्याचेच यातून दिसून येत असल्याचे राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या खा. सुप्रिया सुळे यांनी सांगत, संसदेच्या विशेष अधिवेशनात इंडिया आघाडीतर्फे धनगर आरक्षणप्रश्री आवाज उठवला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
खा. सुळे यांनी सोमवारी रात्री साडेआठ वाजता चोंडीत येऊन धनगर आरक्षणप्रश्री उपोषणास बसलेल्या आंदोलकांशी तब्बल एक तास चर्चा केली. यादरम्यान आ. रोहित पवार आंदोलनस्थळी आले. या वेळी महाविकास आघाडीच्या मुंबईत चालू असलेल्या बैठकीत धनगर आरक्षणाचा विषय चर्चेत घेण्याबाबत खा. सुळे यांनी महाविकास आघाडीचे नेते राजेश टोपे यांच्याशी दूरध्वनीवर चर्चा केली. आ. पवार यांनी जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांच्याशी दूरध्वनीवर चर्चा करून, आंदोलकांची प्रकृती खालावली असल्याने, सररकारने या आंदोलनाची दखल घेण्याबाबत कळवावे असे सांगितले.
धनगर आरक्षणप्रश्नी खा. सुळे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र पाठवण्याबरोबरच ट्विट करून लक्ष वेधणार असल्याचे सांगितले. गेल्या सहा दिवसांपासून उपोषण चालू असतानाही सरकारमधील जिल्ह्याचे पालकमंत्री किंवा अन्य कोणीही मंत्री आंदोलकांकडे फिरकला नसल्याबाबत खा. सुळे यांनी आश्चर्य व्यक्त करत, याबाबत जाब विचारला जाणार असल्याचे सांगितले. केंद्र आणि राज्य सरकारच्या राजपत्रात 36 क्रमांकावर धनगर समाजाला अनुसूचित जमातीचे आरक्षण असल्याचा उल्लेख आहे. या राजपत्राची प्रत या वेळी आंदोलकांनी खा. सुळेंना दिली.
भाजपने भूमिका स्पष्ट करावी
भाजप सरकार राज्यात एक आणि केंद्रात वेगळीच भूमिका घेताना दिसत आहे. संसदेत धनगर आरक्षणाचा प्रश्न मांडला तर भाजपचेच खासदार आरक्षण देण्यास विरोध करतात. त्यामुळे धनगर आरक्षणप्रश्नी भाजपने भूमिका स्पष्ट करावी, असेही आवाहन खा. सुळे यांनी या वेळी केले.
“…तोपर्यंत उपोषण मागे नाही’
उपोषण मागे घेण्याबाबत खा. सुळे यांनी आंदोलकांना विनंती केली. मात्र, उपोषणकर्ते बाळासाहेब दोडतले, अण्णासाहेब रूपनवर आणि सुरेश बंडगर यांनी जोपर्यंत धनगर आरक्षणाचा वटहूकुम निघत नाही, तोपर्यंत उपोषण मागे घेणार नाही आणि वैद्यकीय उपचारही घेणार नसल्याचे सांगिततले.