मुंबई : मंत्री धनंजय मुंडेंचा राजीनामा हे प्राधान्य आहे, त्यांचा राजीनामा लिहून घेतला असून दोन दिवस पुढे ढकलला आहे. दोन दिवसात आम्ही जाहीर करू अशी माहिती आहे. मात्र, मला हे आश्चर्य वाटतं आहे की राजीनामा लिहून घेतला आहे, असं म्हणत धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यावर त्यांच्या पत्नी करुणा शर्मा यांनी एक खळबळजनक विधान केलं आहे. करून शर्मा म्हणाल्या, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पक्षात धनजय मुंडे यांचे मोठे पद आणि कर्तव्य आहे, म्हणून ते दबाव टाकत असतील, माझा राजीनामा घेतला तर मी पार्टी सोडेल असा इशारा देत असतील. पण, शंभर टक्के मला विश्वास आहे, आज संपूर्ण महाराष्ट्र एकच मागणी करतोय की धनंजय मुंडे यांचा राजीनामा. मी मंत्र्यांची बायको आहे, पण मी राजीनामा मागत आहे. कारण, आज जर राजीनामा घेतला नाही तर यापुढे आणखी वाल्मिकसारखे लोक तयार होतील असं मत करुणा शर्मा यांनी व्यक्त केलं. मी तुरुंगात असताना माझी उत्तम व्यवस्था व्हायची, माझ्याशी दररोज धनजय मुंडे फोनवर बोलायचे. मी 6 दिवस एक अॅपल खात होते, त्यानंतर मला 5 स्टारचे जेवण पाठविण्यात आले होते. पण, मी खाल्ले नाही. त्याचप्रमाणे वाल्मिक कराडलाही जेवण पाठविले असेल, मोबाईल दिला असेल असे करुणा शर्मा यांनी म्हटलं आहे. पुढे बोलताना म्हणाल्या, माझे पती भाजपसोबत होते तेव्हा चांगले होते, अजित पवारांच्या राष्ट्रवादीत गेले अन् वाटोळं झाले. त्यापक्षात नवाब मलिक, हसन मुश्रीफ असे सगळे करप्ट लोक आहेत. मी देवेंद्र फडणवीस साहेबांना सांगेल, शिंदे साहेबांपर्यंत बरं होतं, पण यांना का घ्यायला हवे, असा सवाल देखील करुणा शर्मा यांनी यावेळी उपस्थित केला. वाल्मिक कराडची स्वतःची कोणतीही लायकी नाही : करून शर्मा करूणा मुंडे शर्मा यांनी वाल्मिक कराड याच्यावरही गंभीर आरोप केले आहेत. त्यांनी सांगितले की, वाल्मिक कराड याची स्वतःची कोणतीही लायकी नाही. पूर्वी मुंडे घराण्यात घरकाम करणारा कराड, आज 4 हजार 500 कोटी रुपयांचा मालक कसा झाला, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. धनंजय मुंडेंनी केवळ भाषण द्यायचे आणि बाकी सर्व जबाबदारी कराड सांभाळायचा, असे त्यांनी स्पष्ट केले. यासोबतच, पुण्यातील एका प्रभावशाली व्यक्तीचे नाव 6 मार्चला जाहीर करणार असल्याचेही त्यांनी जाहीर केले.