Congress : महाराष्ट्र काॅंग्रेसचा प्रदेशाध्यक्ष बदलणार ? 8 जूनला…. राजकीय वर्तुळात खळबळ
Congress : महाराष्ट्र काँग्रेसमधील अंतर्गत मतभेद पुन्हा एकदा उफाळून आले असून, प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या कार्यपद्धतीविरोधात पक्षातील नाराज नेत्यांनी मोर्चेबांधणी सुरू केल्याची माहिती समोर आली आहे.
Congress : महाराष्ट्र काँग्रेसमधील अंतर्गत मतभेद पुन्हा एकदा उफाळून आले असून, प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या कार्यपद्धतीविरोधात पक्षातील नाराज नेत्यांनी मोर्चेबांधणी सुरू केल्याची माहिती समोर आली आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील नाराज नेत्यांचे शिष्टमंडळ येत्या ८ जून रोजी नवी दिल्लीत जाऊन काँग्रेस हायकमांडची भेट घेणार असून, प्रदेशाध्यक्षपदात बदल करण्याची मागणी मांडणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, या शिष्टमंडळात काँग्रेसचे चार ते पाच विद्यमान आमदार तसेच काही ज्येष्ठ पदाधिकाऱ्यांचा समावेश असणार आहे. हे नेते काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि पक्षाचे सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल यांची भेट घेऊन राज्यातील संघटनात्मक परिस्थितीबाबत आपली भूमिका मांडणार आहेत. (Congress)
संघटन सृजन अभियानावरून नाराजी – (Congress )
काँग्रेसमध्ये सुरू झालेल्या या वादामागे नुकतेच राबविण्यात आलेले ‘संघटन सृजन अभियान’ हे प्रमुख कारण असल्याचे सांगितले जात आहे. या अभियानांतर्गत राज्यभरात शहराध्यक्ष आणि जिल्हाध्यक्षांच्या नियुक्त्या करण्यात आल्या. मात्र, या नियुक्त्यांपूर्वी स्थानिक नेते आणि ज्येष्ठ पदाधिकाऱ्यांना विश्वासात घेतले गेले नसल्याचा आरोप नाराज गटाकडून करण्यात येत आहे.
नियुक्ती प्रक्रियेत पारदर्शकतेचा अभाव असल्याचा दावा करत काही नेत्यांनी पक्ष संघटनेतील निर्णयप्रक्रियेबाबत नाराजी व्यक्त केली आहे. त्यामुळे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांमध्ये असंतोष वाढल्याचेही बोलले जात आहे.
बड्या नेत्यांचेही पाठबळ ? (Congress )
ही मोहीम सध्या काही मोजक्या नेत्यांकडून उघडपणे राबविली जात असली, तरी त्यामागे राज्यातील काही प्रभावशाली काँग्रेस नेत्यांचे अप्रत्यक्ष पाठबळ असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. त्यामुळे हा वाद केवळ संघटनात्मक असंतोषापुरता मर्यादित नसून, पक्षातील गटबाजीचे स्वरूप धारण करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, विधान परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसमधील हा अंतर्गत संघर्ष समोर आल्याने पक्ष नेतृत्वाची चिंता वाढली आहे. आता ८ जून रोजी दिल्लीत होणाऱ्या बैठकीत काँग्रेस हायकमांड नाराज गटाची भूमिका ऐकून कोणता तोडगा काढते आणि प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ (Harshwardhan Sapkal) यांच्या नेतृत्वाबाबत कोणती भूमिका घेते, याकडे राज्याच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.




