Ashok Gehlot : पश्चिम बंगालमध्ये कायदा आणि सुव्यवस्था कोलमडली; काँग्रेस नेते अशोक गेहलोत यांचा आरोप
तृणमूल काँग्रेसचे खासदार अभिषेक बॅनर्जी यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या वृत्तानंतर काँग्रेस नेते अशोक गेहलोत (Ashok Gehlot) यांनी रविवारी पश्चिम बंगालमधील कायदा आणि सुव्यवस्था पूर्णपणे कोलमडल्याचा आरोप केला आहे.

Ashok Gehlot : तृणमूल काँग्रेसचे खासदार अभिषेक बॅनर्जी यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या वृत्तानंतर काँग्रेस नेते अशोक गेहलोत (Ashok Gehlot) यांनी रविवारी पश्चिम बंगालमधील कायदा आणि सुव्यवस्था पूर्णपणे कोलमडल्याचा आरोप केला आहे. या परिस्थितीसाठी त्यांनी भाजप आणि निवडणूक आयोगाला जबाबदार धरले आहे.
विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना राजस्थानचे माजी मुख्यमंत्री गेहलोत (Ashok Gehlot) यांनी दावा केला की, निवडणुकीत तृणमूल काँग्रेसचा पराभव झाल्यापासून राज्यात हिंसेच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. निवडणुका झाल्यापासून पश्चिम बंगालमध्ये मोठ्या प्रमाणावर गुंडगिरी सुरू आहे.
टीएमसी कार्यकर्त्यांच्या कार्यालयांवर हल्ले केले जात असून ती जबरदस्तीने रिकामी करून घेतली जात असल्याचा आरोप त्यांनी केला. या घटनांमध्ये भाजप आणि आरएसएसशी संबंधित लोक सामील असल्याचा दावाही त्यांनी केला. अशोक गेहलोत (Ashok Gehlot) यांनी निवडणूक आयोगावरही जोरदार टीका केली.
निवडणुकीदरम्यान सुरक्षा दलांची अवाजवी आणि मोठ्या प्रमाणावर झालेली तैनाती ही निवडणूक प्रक्रियेवर प्रभाव पाडणारी होती, असा आरोप त्यांनी केला. एकाच राज्यात सुमारे २.५ लाख सुरक्षा कर्मचारी तैनात करण्यात आले होते. हे अभूतपूर्व आहे. निवडणूक आयोगाने ही परिस्थिती निर्माण केली, असे ते म्हणाले.
सुमारे २७ लाख मतदारांना त्यांच्या मतदानाच्या अधिकारापासून कथितपणे वंचित ठेवण्यात आले असा दावा करत गेहलोत म्हणाले की, गरज पडल्यास निवडणुका पुढे ढकलायला हव्या होत्या. तुम्ही एकाही मतदाराला त्याच्या अधिकारापासून वंचित ठेवू शकत नाही.
भाजप ज्याला डबल इंजिन म्हणतात, त्याचा परिणाम म्हणजे दुप्पट दबाव आणि सत्तेचा गैरवापर आहे, तसेच, तरुणांनी सध्याची राजकीय परिस्थिती समजून घेतली पाहिजे आणि विचारधारेने प्रेरित होऊन राजकारणात भाग घेतला पाहिजे, असे आवाहन त्यांनी केले.






